
आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणी दिलं नाही. तसंच अत्यंत वाईट वागणूक दिली असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. यासंबंधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. माझ्या जातीवरून माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. मला वॉशरूमही वापरू दिलं गेलं नाही असे गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणी दखल घेतली असून लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणी राज्य सरकारला चोवीस तासात उत्तर द्यायला सांगितलं आहे.
लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नवनीत राणा यांनी काय म्हटलं आहे?
आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही. माझ्या जातीवरून माझा पोलीस ठाण्यात छळ करण्यात आला. मी खालच्या जातीची असल्याने मला बाथरूम वापरण्यास मनाई करण्यात आली. रविवारीही एक ट्विट करून नवनीत राणा यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यासंदर्भातलं एक ट्विटही त्यांनी केलं होतं.
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा मातोश्री समोर पठण करणार असल्याची घोषणा केली. त्यावरून चांगलाच राडा झाला. त्या प्रकरणात या दोघांनाही शनिवारी अटक करण्यात आली. या दोघांनाही २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवसेनेने २०१९ ला हिंदुत्वाशी तडजोड करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन केलं. असा आरोप नवनीत राणांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकटं वाढली आहेत म्हणून हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून बराच राडा झाला ज्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना अटक करण्यात आली.
ओम बिर्लांना लिहिलेल्या पत्रात आणखी काय म्हटलं आहे नवनीत राणांनी?
मी अमरावतीमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले आहे. मला २३ एप्रिल २०२२ ला संध्याकाळी ४.३० च्या सुमारास कोणतीही नोटीस न देता मला आणि माझ्या पतींना (रवी राणा) अटक करण्यात आली. अटक करण्यासाठी पोलीस आले तेव्हा मी खासदार आणि माझे पती आमदार आहेत. तरीही त्यांनी आमचं काहीही ऐकून घेतलं नाही.
२३ तारखेला मला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मला तिथे जी वागणूक देण्यात आली त्यामुळे धक्काच बसला. मला खार पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्ये ठेवण्यात आलं. मी पिण्यासाठी पाणी मागत होते मात्र मला पाणीही देण्यात आलं नाही. मी वारंवार पाणी मागितलं तरीही मला पाणी देण्यात आलं नाही तुम्ही खालच्या जातीच्या आहात तुम्हाला इतर लोक ज्या ग्लासात पाणी देतात त्या ग्लासात पाणी देता येणार नाही असं सुनावण्यात आलं. मला माझ्या जातीवरून सातत्याने हिणकस शब्दात शेरेबाजी करत ऐकवण्यात आलं.
मी जेव्हा पोलिसांकडे बाथरूम वापरण्याची परवानगी मागितली तेव्हा मला ती देखील नाकारण्यात आली. तसंच पोलीस माझ्याशी अत्यंत अर्वाच्य भाषा वापरत माझा अपमान केला. मी खालच्या जातीची असल्यानेच मला ही वागणूक देण्यात आली, असे गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केले आहेत.