काँग्रेस नेतृत्वास हे कधी उमगणार?; शिवसेनेचं काँग्रेसला सल्ल्याचं ‘टॉनिक’
गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह वाढला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून पक्षाध्यक्षपदाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. यावरून काँग्रेसच्या भविष्याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर शिवसेनेनं भाष्य केलं असून, काँग्रेस नेतृत्वाला सल्ल्याचं टॉनिक देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून काँग्रेसमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. शिवसेना म्हणते, “काँग्रेस पक्षाचे काय […]
ADVERTISEMENT

गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह वाढला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून पक्षाध्यक्षपदाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. यावरून काँग्रेसच्या भविष्याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर शिवसेनेनं भाष्य केलं असून, काँग्रेस नेतृत्वाला सल्ल्याचं टॉनिक देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून काँग्रेसमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. शिवसेना म्हणते, “काँग्रेस पक्षाचे काय होणार, असा घोर अनेकांना लागला आहे. महात्मा गांधी त्यांच्या इच्छेनुसार काँग्रेसचे विसर्जन सुरू आहे काय? अशा आनंदाच्या उकळ्या भारतीय जनता पक्षाला फुटत आहेत. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे काम उरले नाही व तिचे विसर्जन करावे, असे महात्मा गांधींचे सांगणे होते. ते तितकेसे खरे नाही. स्वातंत्र्यानंतर पन्नासेक वर्षे काँग्रेस सत्तेवर राहिली व आजही अनेक राज्यांत काँग्रेसचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे, भाजपच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत ‘पतली’ झाली व काँग्रेसच्या वाड्यातील उरलेसुरले वतनदारही सोडून चालले आहेत.”
“पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?”, असा प्रश्न शिवसेनेनं पंजाब काँग्रेसमधील परिस्थितीवरून उपस्थित केला आहे.
“तिकडे 79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपत जातील, असं सांगितले जात होतं, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील, असे दिसत आहे. कॅ. अमरिंदर म्हणतात, ‘मी तीन कृषी कायद्यासंदर्भात अमित शहांची भेट घेतली.” हे सपशेल झूट आहे. मुख्यमंत्री असताना हेच अमरिंदर पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगत होते, आंदोलन पंजाबात करू नका, तर दिल्लीत करा. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची ही आक्रमकता स्वराज्यात नको होती.”