ऑपरेशननंतर पहिल्यांदाच जनतेसमोर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसापूर्वीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे केले अनेक दिवस मुख्यमंत्री हे आपल्या निवासस्थानावरुनच राज्याचं कामकाज पाहत होते. एवढंच नव्हे तर हिवाळी अधिवेशनाला देखील ते हजर राहू शकले नव्हते. असं असताना मुख्यमंत्री आज (1 जानेवारी) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर आले.

आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेसमोर आपली मतं व्यक्त केली. मात्र, यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा देखील केली आहे. पाहा मुख्यमंत्री आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आजपासून सुरु झालेलं नवीन वर्ष हे सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो. यापुढची सुद्धा सर्व वर्ष उत्कर्षाची जावोत या माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. अनेकांना असं वाटलं असेल की, मी टीव्हीवर दिसलो की, म्हणजे मी फक्त कोरोनावर बोलणार. पण मी आज कोरोनावर बोलणार नाहीए. आवश्यकता लागू नये पण लागली तर काही दिवसांनी बोलेन. आजचा हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे.

मला व्यक्तीश: एक तर अस्सल मुंबईकर त्यानंतर शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि साहजिकच आहे की, आपली मुंबई ज्या राज्याची राजधानी आहे देशाचं आर्थिक केंद्र आहे त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मनोमन आनंद होतो आहे. एकनाथजी आपण जे बोललात ते बरोबर आहे.

ADVERTISEMENT

एक थोडसं नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळंमुळं आहेत ती विसरुन चालणार नाही. 1966 पासून मुंबई जन्माला आलेली शिवसेना ही आज कित्येक वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय.

ADVERTISEMENT

हे आता आमच्या घराण्याची चौथी पिढी आहे. माझे आजोबा हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते. जे पाच महत्त्वाचे नेते होते त्यातील माझे आजोबा हे महत्त्वाचे शिलेदार होते. त्यानंतर माझ्या वडिलांची काही ओळख करुन देण्याची आवश्यकता नाही शिवसेनाप्रमुखांची.. मी तुमच्यासमोर आहे आणि चौथी पिढी म्हणजे आता आदित्य आहे.

जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि नुसतं काम म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी सुरु केलं. तेच आज आम्ही पुढे नेत आहोत. आज तर मला तुमच्यासारखे सगळे.. शासनातले आणि संघटनेतील सहकारी आणि सोबती मिळालेले आहेत.

मला ते देखील दिवस आठवत आहेत की, शिवसेनाप्रमुख स्वत: जातीने जाऊन रस्त्यांचं काम कसं सुरु आहे. एखादं नालेसफाईचं काम कसं सुरु आहे. इतर कोणतीही कामं असत ते तिथे जाऊन सूचना द्यायचे. मी देखील अनेक ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करायचो. आता माझा हा ताण थोडासा.. थोडासा नाही जवळजवळ पूर्णच आदित्यने कमी केला आहे. तो रात्री-अपरात्री नगरसेवक, महापालिका अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी करतो.

सुविधा तर द्यायच्या आहेत मग ते मेट्रो असेल रस्त्यांची कामं असतील, नालेसफाई असेल, सौंदर्यीकरण असेल पण एक विचार असा डोक्यात आला की, मुंबईकर.. आता कर म्हटलं म्हणजे यांनी फक्त करच भरायचे का? म्हणजे देतोय आपला दोन्ही कराने.. पण त्याला मिळतंय काय?

बऱ्याचदा आपण असं म्हणतो जे मला स्वत:ला मान्य नाही. की, आपण कामं केल्याची होर्डिंग लावतो, जाहिराती देतो.. ठीक आहे तिथे माझा फोटो असेल, अस्लम भाईचा असेल.. एकनाथजींचा असेल… आम्ही हे केलं.. अरे हो आम्ही हे केलं… नक्की केलं.. पण हा सगळा जो पैसा आहे. हा पैसा जनतेचा आहे. त्यांच्या कष्टाचा पैसा आहे.

आपण असं काही मोठं केलेलं नाही. जे आपलं काम आहे ते आपण केलंच पाहिजे. ते काम आपण केलं तर त्याची जाहिरात करायची हे मला स्वत:ला पटत नाही.

एक गोष्ट बरोबर आहे की, राजकारण आहे.. आपण काही केलं तर भष्ट्राचार केला नाही केलं तर याने काहीच नाही केलं. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवायची आहे. यालाच तर राजकारण म्हणतात. अनेक जण असे असतात किंवा आहेत. ते वाट्टेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. ज्या काही होण्यातील नाही त्या सांगतात लोकं फसतात. मग मतं देऊन मोकळे होतात. मग पाच वर्ष काही बोलायचं नाही.

मग पुढच्या निवडणुकीला बोलतात, की तुम्ही आमच्यासाठी तारे तोडून आणणार होता. नाही पण ते निवडणुकीत बोलावं लागतं. असं बोलल्यानंतर लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. अशा काही गोष्टी आपण केलेल्या नाहीत आणि करणार नाही.

शिवसेना आणि आता तर सोबत नवीन मित्र आलेले आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. आता आपण तिघे मिळून पुढे जात आहोत. इतर पक्ष.. आता आपण तिघे एकत्र आल्यानंतर इतर पक्ष कोण राहिले असेल ते तुम्हाला कळलं असेल. असंच चाललेलं आहे.

आम्ही या गोष्टी करु, आम्ही त्या गोष्टी करु.. नंतर कालांतराने तेही विसरतात आणि लोकंही विसरतात. पण शिवसेनेची जी परंपरा शिवसेनाप्रमुखांनी आखून दिली आहे. एक म्हणजे खोटं बोलायचं नाही. जे जमणार असेल तेच वचन द्यायचं जे जमणार नसेल निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणारं असलं तरीही खोटं वचन द्यायचं नाही. ही आपली परंपरा आहे.

त्याच परंपरेत माझ्यासोबत बसलेले आहेत एकनाथाजी आहेत, यशवंत आहेत, किशोरीताई आहेत. सगळे शिवसैनिक हे त्यातून मोठे झाले आहेत. तीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. आज मला आनंद एका गोष्टीचा होतो आहे की, 2017 रोजी आपण अनेक आश्वासनं किंवा वचनं.. आपण वचन देतो आणि वचन पाळतो. आपण एक वचनामा जाहीर केला.

कारण शेवटी निवडून कशासाठी द्यायचं, मतं आम्ही तुम्हाला का द्यायची. तुम्ही असं आमच्यासाठी काय करणार आहात. हे तर लोकांना सांगायलाच पाहिजे. ते जर सांगितलं नाही तर लोकं मत देणार नाहीत. कशाला आम्ही तुम्हाला मत देऊ?.. काहीच जर का करणार नसाल, माझं जीवन सुसह्य करणार नसेल तर काय उपयोग काय तुमचा माझा मला?.. मग काय म्हणून तुम्हाला मतं देऊ. त्यावेळेला जो वचननामा तयार केला त्यातील बहुतांश वचनं ही आपण पूर्ण केलेली आहेत.

एक आपलं जे महत्त्वाचं वचन राहिलं होतं. ते हेच की जे पाचशे फुटापर्यंत जे नागरिक मुंबईकर आपल्या घरात राहतात पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणं हे महत्त्वाचं वचन हे त्या वचननाम्यातील आहे. हे वचन विचारपूर्वक दिलं होतं.

आपल्याला हा सगळा लेखाजोखा आपल्याला जनतेला द्यावाच लागेल. की, 2017 साली आम्ही काय बोललो होतो त्यातलं काय राहिलंय हे प्रामाणिकपणाने सांगू आणि काय-काय केलेलं आहे हे सुद्धा एक धाडसाची काय आवश्यकता नाही पण रोखठोकपणाने जे विरोधक अंगावर येतील त्यांना हे सांगणं गरजेचं आहे.

हा सगळा लेखाजोखा मांडत असताना महत्त्वाचा जो मुद्दा होता मालमत्ता कर रद्द.. हा निर्णय घेण्यामागे ज्यांचा-ज्यांचा सहयोग आहे त्या सर्वांना खास व्यक्तीश: तर धन्यवाद देतो आहे पण मुंबईकरांच्या वतीनेसुद्धा तुम्हाला लाख-लाख धन्यवाद देतो.

मी पुन्हा एकदा सांगतो की, व्यक्तीश: मी तर आहेच शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणूनही मी आज खूप आनंदित आहे, समाधानी आहे कारण जे वचन आपण त्या वेळेला दिलं होतं. एक मुंबईकरांना दिलासा.. देशाचा आर्थिक केंद्र असणारी मुंबई सांभाळणं, तिची अर्थव्यवस्था सांभाळणं… या सगळ्या नागरिकांना ज्यांनी कष्टांनी मुंबई उभारली आहे त्या कष्टकऱ्यांचा घाम ते गाळत आहेत त्याचं मोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे.

“कोरोनावर बोलण्याची गरज पडू नये, पण…”; आजारपणानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच जनतेसमोर

कारण अनेक जण येतात आणि अनेक जातात.. पण आम्ही तोडांच्या वाफा सोडत नाही. बोलतो ते करतो.. त्या वचनाला आपण जागलेलो आहोत. त्यामुळे तात्काळ या निर्णयाची घोषणा नाही तर अंमलबजावणी पाहिजे. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे.

मुंबईकरांचा जो विश्वास आमच्यावर आहे की, जे बोलतात ते करतात.. हाच भाग नाही तर ज्या-ज्यावेळी आपत्ती येते मग ती नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल तेव्हा धावून हिच लोकं येतात. बाकीची लोकं त्यावेळेला.. मी आपल्या विरोधकांचं बोलतोय. ते त्यावेळेला बाकी कुठे असतात हे शोधावं लागतं.

असो… राजकारणाबाबत मी आज काही बोलत नाही. पण खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्यासारखे सगळे सहकारी लाभल्यानंतर मी मुंबईकरांना वचन देतो की, तुम्ही निश्चिंत राहा.. तुमच्या सगळ्या आरोग्याची किंवा इतर सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. फक्त आपले आशीर्वाद आमच्या पाठिशी खंबीरपणे असू द्या. एवढीच एक विनंती करतो. सर्वांना शुभेच्छा देतो.. जय हिंद.. जय महाराष्ट्र!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT