दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे ‘संकटमोचक’
दिलीप वळसे पाटील हे आता महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले. हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. बॉम्बे हायकोर्टाने अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे अनिल देशमुख यांना पद सोडावं लागलं. त्यांच्या जागी दिलीप वळसे यांना निवडण्यात आलं […]
ADVERTISEMENT

दिलीप वळसे पाटील हे आता महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले. हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. बॉम्बे हायकोर्टाने अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे अनिल देशमुख यांना पद सोडावं लागलं. त्यांच्या जागी दिलीप वळसे यांना निवडण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीवर जर नजर टाकली तर कोणत्याही वाद-विवादाशिवाय त्यांची कारकीर्द आत्तापर्यंत पार पडली आहे. त्यामुळेच त्यांनी निवड गृहमंत्री म्हणून झाली असावी हे आता दिसतंय.

दिलीप वळसे पाटील आणि मी एकाच हॉस्टेलमध्ये वास्तव्य करत होतो. त्यांना महाविद्यालयीन जीवनापासून हा आत्मविश्वास होता की आपण राजकारणातच जाणार आहोत. राजकीय पक्षाचंच काम करणार आहोत हे त्यांचं ध्येय नक्की झालं होतं. शरद पवारांसोबतच काम करायचं असं काही तेव्हा त्यांनी निश्चित केलं नव्हतं. पण राजकारणात जाणार हे त्यावेळपासूनच त्यांनी नक्की केलं होतं. हॉस्टेलमध्ये असतानाही त्यांचे जे मित्र होते ते थोडीफार राजकीय पार्श्वभूमी असलेले होते. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळी मुलं ही त्यांची त्या काळात मित्र होती आणि आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या घोळक्यातच दिलीप वळसे पाटील कायम असे. शासकीय विधी महाविद्यालयातील मुलंच कायम त्यांच्या अवतीभवती असायची. मी त्यावेळी इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये होतो. त्याकाळात मी महाविद्यालयीन कार्यक्रमात सक्रिय असे. त्यामुळे माझा आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी सतत संपर्क येत होता. तिथल्या स्टुडंट बॉडीचा मी अध्यक्ष आणि दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष होते. एक वर्ष आम्ही कामही केलं होतं.
दिलीप वळसे पाटील उत्तम संसदपटू होणं, ते कौशल्य त्यांनी आत्मसात करणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. कोणतीही गोष्ट अभ्यास करूनच ते बोलत असत. आमचे अनेकदा वाद होत असत, राजकीय स्वरूपातल्या चर्चा आणि वाद होत असत. दिलीप वळसे पाटील हे कोणतीही मतं विना अभ्यास, विना वाचन व्यक्त करतच नसत. ते जसं बोलत असत ते कृतीत आणत असत. ज्यावेळी ते विधानसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना या आपल्या अभ्यासू स्वभावाचा प्रचंड फायदा झाला.










