Ravikant tupkar : पोलिसाच्या वेशात आले अन् तुपकरांनी अंगावर ओतलं पेट्रोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज़का खान :

Ravikant Tupkar latest News : कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाण्यात आंदोलन सुरू असून, आज (11 फेब्रुवारी) रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज ते अचानक पोलिसाच्या वेशात आले आणि अंगावर पेट्रोल ओतून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Ravikant Tupkar protest)

शेतमालाला चांगला भाव मिळण्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आक्रमक झाले आहेत. शनिवारी (11 फेब्रुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी रविकांत तुपकर हे पोलिसाचा गणवेश घालून आले. रविकांत तुपकरांनी पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रविकांत तुपकर यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं. यावेळी तुपकर यांची आई आणि पत्नीही घटनास्थळीच होत्या. आई आणि पत्नीसमोरच तुपकरांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

रविकांत तुपकरांनी आधीच दिला होता इशारा

कापूस, सोयाबीनला भाव आणि पीक विम्याच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आधीच सरकारला इशारा दिला होता. 11 फेब्रुवारीपर्यंत या प्रश्नांवर निर्णय घेण्याबद्दल अल्टिमेटम देताना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईतील एआयसी पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करु, असं रविकांत तुपकर म्हणाले होते.

ADVERTISEMENT

इशारा दिल्यानंतर पोलीस रविकांत तुपकर यांचा शोध घेत होते. गेल्या चार दिवसांपासून रविकांत तुपकर हे भूमिगत झाले होते. त्यानंतर त्यांनी आज पोलिसाच्या वेशात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

सरकारला लाज वाटत नाही, शेतकऱ्यांना गोळ्या घाला -रविकांत तुपकर

यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. “आम्हाला गोळ्या घाला. शेतकऱ्यांना गोळ्या घाला. आमच्या मागण्या मान्य करत नसाल, तर आम्हाला मारून टाका. हे कसलं सरकार आहे. या सरकारला जनतेशी, शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही”, असं रविकांत तुपकर आंदोलनावेळी म्हणाले.

“या सरकारला लाज वाटत नाही. हे लाज नसलेलं सरकार आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून फक्त घोषणा करणार सरकार आहे. हे सरकार कृती शून्य आहे,” अशा शब्दात आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT