मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसाच का? राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर भाषण केलं. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो मशिंदीवरचे भोंगे खाली उतरवण्याचा. या भोंग्याचा लोकांना त्रास होतो आणि हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंवर टीका झाली. या टीकेला उत्तर देण्यासाठी १२ एप्रिलला राज […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर भाषण केलं. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो मशिंदीवरचे भोंगे खाली उतरवण्याचा. या भोंग्याचा लोकांना त्रास होतो आणि हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंवर टीका झाली. या टीकेला उत्तर देण्यासाठी १२ एप्रिलला राज ठाकरेंनी उत्तरसभाही घेतली होती.
१२ एप्रिलला ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी सरकारला मशिदींवरच्या भोंग्यांबाबत ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला. ३ मे रोजी रमजान ईद आहे तोपर्यंत सरकारने भोंगे खाली उतरवावेत नाहीतर आम्हाला त्याविरोधात हनुमान चालीसा पठण करावं लागेल असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. रामनवमीच्या दिवशी शिवसेना भवनासमोरही मनसेने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम केला होता ज्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं होतं. मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसाच का? याचं उत्तर आता दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच दिलं आहे.
हनुमान चालीसाच का निवडली? राज ठाकरे म्हणतात…
“मशिदींवरच्या भोंग्याविरोधात अल्टिमेटम देताना मी हनुमान चालीसाच का निवडली याचं कारण आहे ते म्हणजे.. प्रश्न असा होता की माझी इच्छा आहे की देशातल्या मशिदींवरचा लाऊडस्पीकर जाणं गरजेचं आहे. जर तसं करायचं असेल तर देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातल्या सर्व हिंदूंनी त्याचा विचार करणं आणि सगळ्यांनी ते म्हणणं गरजेचं आहे. नुसतं महाराष्ट्रात होऊन चालणार नाही ना? त्यादिवशी एक बातमी आली होती की मुंबईतल्या मशिदींवरच्या भोंग्याचा आवाज काही डेसिबलने कमी झाला वगैरे… हा विषय फक्त मुंबईचा नाही. देशभरातल्या सगळ्या नागरिकांना त्रास होतो. मी दुबईला गेलो होतो दोन-तीनदा. तिथेही मी कधी अजान भोंग्यांवर ऐकली नाही. देशभरात हे सगळं पोहचलं पाहिजे म्हणून हनुमान चालीसा निवडली” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
‘दुसऱ्याच्या घरात हनुमान चालीसा वाचून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा का आणता?’ हायकोर्टाने राणांना झापलं
हनुमान चालीसा या विषयावरून सध्या राज्यात आणि देशात राजकारण चांगलंच रंगतं आहे. मुंबईसह राज्यभरात हा विषय राज ठाकरेंमुळे सुरू झाला. आता औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता कायम आहे. अशात एबीपी माझाच्या माझा कट्टा या दशकपूर्ती कार्यक्रमात हनुमान चालीसाच आपण का निवडली याचं उत्तर राज ठाकरेंनी दिलं आहे.