Uniform Civil Code : देशात समान नागरी कायदा लागू करण्याची ‘हीच ती वेळ’ – दिल्ली हायकोर्ट
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सध्याची वेळ ही अत्यंत योग्य वेळ आहे असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे. केंद्र सरकारने या अनुषंगाने योग्य तो विचार करावा असंही दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केलं. घटस्फोटाच्या एका प्रकरणात निकाल देत असताना न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे की आधुनिक भारतात जात, धर्म, प्रांत यांच्यामुळे निर्माण होणारे अडथळे हे हळूहळू […]
ADVERTISEMENT

देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सध्याची वेळ ही अत्यंत योग्य वेळ आहे असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे. केंद्र सरकारने या अनुषंगाने योग्य तो विचार करावा असंही दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केलं. घटस्फोटाच्या एका प्रकरणात निकाल देत असताना न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे की आधुनिक भारतात जात, धर्म, प्रांत यांच्यामुळे निर्माण होणारे अडथळे हे हळूहळू कमी होत आहेत. त्यामुळे विवाह तसंच घटस्फोटांच्या काही प्रकरणांमध्ये काही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे देशात समान नागरी कायदा लागू करण्याची ही योग्य वेळ आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
युवा पिढीला कोणताही त्रास भोगावा लागू नये म्हणून समान नागरी कायदा लागू करणं आवश्यक आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 समान नागरी कायदा लागू होण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट वास्तवात उतरली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. घटस्फोटाच्या एका प्रकरणात हिंदू विवाह कायद्याप्रमाणे निकाल द्यावा की मीना जमातीच्या नियमांच्या आधारे निकाल द्यावा असा प्रश्न पडला होता. या प्रकरणात पतीला हिंदू विवाह कायद्याप्रमाणे घटस्फोट हवा होता तर मी मीना जमातीची असल्याने मला हिंदू विवाह कायदा लागू होत नाही असा पत्नीचा दावा होता. पतीने कुटुंब न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावावा अशी पत्नीची मागणी होती. त्याविरोधात पतीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पतीचे म्हणणे मान्य केले.
या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने म्हटलं आहे की वैयक्तिक कायद्यांमध्ये असलेल्या फरकांमुळे अनेकदा न्यायालयांना पेचप्रसंगाना सामोरं जावं लागतं. अशावेळी समान नागरी कायद्याची गरज मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे या निकालाची प्रत केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे त्वरित पाठवण्यात यावी. केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू कायदा करण्याबाबत विचार करावा असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आदी वैयक्तिक विषयांसाठी भारतात वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, ख्रिश्चन विवाह कायदा, पारसी विवाह व घटस्फोट कायदा अस्तित्वात आहे. मुस्लिमांच्या वैयक्तिक बाबींसाठीचे कायदे हे शरियतवर आधारित आहेत.