
औरंगाबाद शहरातला पाणी प्रश्न पेटला आहे. अशात MIM चे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच एक आव्हान दिलं आहे. तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात एकटे फिरून दाखवा लोक तुम्हाला हंड्याने मारतील असं जलील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत इम्तियाज जलील? (Imtiaz Jaleel)
पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले होते. त्यांनी पाणीपट्टी अर्धी केली. मात्र असं करून पाणी मिळणार आहे का? पैसे पूर्ण घ्या मात्र आम्हाला पाणी द्या अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस येत आहेत, त्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील दोघेही नौटंकी करून जाणार. हे सगळं करू नका. दोघेही एकटे तुमचा नगरसेवक असलेल्या भागात एकटे, कोणतेही संरक्षण न घेता, कार्यकर्ते आणि नेते न घेता जाऊन आम्ही पाण्यावर बोलणार आहे. असं सांगा, मग बघा आई-बहिणी तुम्हाला रिकाम्या हंड्याने मारहाण करतील अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस औरंगाबादला येऊन पाणी प्रश्नावर आंदोलन करणार आहेत. अशी घोषणा भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. त्यावर एमआयएम प्रदेशाध्यक्ष खा इम्तियाज जलील यांनी टीका करत ही नौटंकी असल्याचा आरोप केला. गेली तीस वर्ष शिवसेनेसोबत होते त्यावेळी लुटून खाल्लं, पाण्यासाठी योग्य निर्णय का नाही घेतला? आता लोक मूर्ख नाही असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरही भाष्य
औरंगजेबाच्या कबरीवर इम्तियाज जलील आणि अकबरूद्दीन ओवेसी यांनी फुलं वाहिली यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. अनेक नेत्यांनी आमच्यासाठी धमकीची भाषा वापरली आहे. मात्र या सर्वांना वेळ आल्यावर आम्ही उत्तर देऊ. मनसे, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जी भाषा वापरली ते सगळं जनतेने ऐकलं आहे. त्यांच्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.