भाजपचं सरकार सत्तेत येण्यास फक्त राष्ट्रवादीच जबाबदार! पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिले आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला महाराष्ट्रात गरज पडली तेव्हा तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना मदत केली, अडचणीतून सोडवलं असा आरोप केला जातो. पहिल्यांदा 2014 ला भाजपला सरकारस्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने शिवसेनेची राजकीय कोंडी केली होती. 2019 ला तर फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राने भाजप राष्ट्रवादीचे एक वेगळंच समीकरण बघितलं.

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या या खास संबंधावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी काय आरोप केला आहे? आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीमधलं हे कुरघोडीचं राजकारण नेमकं काय आहे? बघूया.

2014 मध्ये महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार सत्तेत होते, मात्र मुख्यमंत्री चव्हाण आणि पवार यांच्यातले मतभेद हे उघड होते. दोघांकडूनही एकमेकांना कानपिचक्या देण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या फाईली अडवून धरतात, धोरणांची अंमलबजावणी करत नाही असा राष्ट्रवादीचा त्यांच्यावर आरोप होता. राष्ट्रवादीच्या फाईलवर सह्या करताना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारतो का हे पवारांचे तेव्हाचे विधान गाजलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याशिवाय सिंचन क्षेत्रात 70 हजार कोटी खर्च करुन काहीही फायदा झाला नाही असा पृथ्वीराज चव्हाणांनी आरोप केला होता. तसेच छगन भुजबळांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातदेखील चव्हाणांची भूमिका हा संदिग्ध होती. चव्हाणांच्या या भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा चांगलीच अडचणीत आली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधल्या या संघर्षाची परिणाम हा अखेर सरकार पडण्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळले. राष्ट्रवादीचा हा आरोप होता की चव्हाणांच्या या धोरणांमुळे आणि राष्ट्रवादी विरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे आघाडी सरकारची प्रतिमा मलीन झाली आणि त्याचा फाय़दा 2014 मध्ये भाजप सेनेला झाला.

ADVERTISEMENT

पृथ्वीराज चव्हाण यांनी याच घटनेचा धागा पकडत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राज्यात 2014 मध्ये आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार तर पडलेच, पण याच घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास आणि सत्तेत येण्यास मदत झाली, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

ADVERTISEMENT

पृथ्वीराज चव्हाणांच्य़ा या विधानावर आता राष्ट्रवादीकडून काय उत्तर येणार हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे भाजप विरोधात राष्ट्रीय पातळीवर सर्वपक्षीय आघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे चव्हाणांच्या या विधानामुळे पवार आणि चव्हाण यांच्यातला संघर्ष हा पुन्हा एकदा समोर आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT