
राज्यसभा निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरताना दिसतेय. मतदानापर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाने उत्सुकता शिगेला नेलीये. गुजरातमध्ये झालेल्या राजकीय नाट्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र, हरयाणात होताना दिसतेय. त्यामुळे गुजरातमध्ये २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं होतं, याची चर्चा होतेय. तर जाणून घेऊयात काय घडलं होतं २०१७?
२०१७ मध्ये गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक झाली होती. तीन जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत एका जागेवर उमेदवार होते काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे अहमद पटेल. दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित होता, पेच होता तिसऱ्या जागेचा.
तिसऱ्या जागेसाठीच भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळाला होता. अहमद पटेल यांच्याविरुद्ध भाजपनचे उमेदवार होते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते बलवंत राजपूत. याच निवडणुकीचा निकाल मध्यरात्री लागला होता आणि अहमद पटेल यांनी या चर्चेत राहिलेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता.
अहमद पटेल विरुद्ध अमित शाह
अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य तर मानलेच जायचे, त्याचबरोबर ते सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागारही होते. दुसरीकडे या जागेवर भाजपचे चाणक्य मानले जाणार अमित शाहांनी ताकद लावली होती. त्यामुळे अहमद पटेल विरुद्ध बलवंत राजपूत अशी निवडणूक असली, तरी ती झाली होती अहमद पटेल विरुद्ध अमित शाह अशीच.
गुजरातमधून राज्यसभा उमेदवाराला विजयी होण्यासाठी ४७ मतांची गरज असते. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी १७ वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या शंकर सिंह वाघेला यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्याबरोबरच काँग्रेसच्या दोन आमदारांनीही काँग्रेस सोडली. त्यानंतर दोन दिवसांतच आणखी तीन काँग्रेस आमदारांनी भाजपत प्रवेश केला.
निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला हे धक्क्यांवर धक्के बसत होते. या सगळ्या राजकीय उलथापालथीनंतर गुजरात विधानसभेतील सदस्य संख्या १७६ वर आली. त्यामुळे विजयी होण्यासाठीच गणित बदलून ४५ मतांवर आलं.
ही निवडणूक अमित शाह यांनी मनावर घेतली होती. तिसऱ्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अमित शाह यांनी गुजरात गाठलं आणि तळ ठोकला. अहमद पटेल यांच्या पराभवासाठी शाहांनी रणनीती आखली. त्याचवेळी संभाव्य धोका ओळखलेल्या काँग्रेसने आपले आमदार तातडीने रिसॉर्टवर हलवले.
आपले उमेदवार सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या काँग्रेसला पुन्हा एक झटका बसला. काँग्रेस आणि जदयूने काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे काँग्रेससमोर एकामागोमाग एक आव्हान निर्माण झाली होती.
एक तक्रार आणि निकालच बदलला
राज्यसभा निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसच्या एका आमदाराने क्रॉस व्होटिंग केलं. काँग्रेसने आरोप केला की, काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर पडताना अमित शाह यांनी विजयी खूण केली. त्यामुळे त्यांची मतं रद्द करण्यात यावीत.
याच मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले. मध्यरात्री हे सगळं घडतं होतं.
रात्री १२ वाजता आला फैसला
भाजपकडून अरुण जेटली, रविशंकर प्रसाद आणि पीयूष गोयल हे नेते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले होते. तर काँग्रेसकडून कपिल सिब्बल, रणदीप सुरजेवाला यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षातील नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धावपळ सुरू होती. रात्री १२ वाजता न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला.
...अन् अहमद पटेल जिंकले
केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या बाजूने निर्णय दिला. काँग्रेसच्या दोन्ही आमदारांची मते बाद ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण मतांची संख्या १७६ वरून घटून १७४ झाली आणि विजयासाठीच्या आवश्यक मतं ४३.५१ मतांवर आली. रात्री दीड वाजता मतमोजणी करण्यात आली. रात्री दोन वाजता अहमद पटेल यांना विजयी घोषित करण्यात आलं.