
आज भारतात चुकीचे विचार पसरवले जात आहेत. केवळ राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातं आहे असं म्हणत नाव न घेता शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पुण्यात जश्न ए ईद ए मिलन या राष्ट्रीय स्नेह मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
आपला देश अनेक जाती धर्मांनी बनला आहे. यामध्ये विविधता आहे. ती उठून दिसली पाहिजे. या देशात जी फुलं उमलली आहेत त्यांचा सन्मान करायला हवा. आज जगात चमत्कारी स्थिती निर्माण झाली आहे. रशिया छोट्याश्या युक्रेनवर हल्ला करतो आहे. हजारो लोकं मारली जात आहेत. मानवतेचं दर्शन संपल्याचं दिसतं आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला आहे. संघर्ष सुरू आहे आणि राज्यकर्ते भूमिगत झाले आहेत. पाकिस्तानात पंतप्रधानाला पद सोडावं लागलं. हे का घडतंय? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका यामुळे होतंय.
पुढे शरद पवार म्हणाले की, "आज देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्या विरोधात उभं रहावं लागेल. यांना धडा शिकवावा लागेल. आज आपण इथे जमलो आहोत कारण आपण जात धर्म बाजूला ठेवायचा आहे. आपल्याला माणुसकी जपायची आहे. महागाई, विकासाचे प्रश्न उभे आहेत. मात्र देशात जे चित्र उभं झालंय त्या अनुषंगाने आपल्याला सध्या भाईचारा जपणं आवश्यक आहे. आजच्या घडीला चुकीचे विचार पसरवले जात आहेत. राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातं आहे हे चांगलं नाही. त्याविरोधात उभं राहिलं पाहिजे" असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
मी अनेक वेळा पाकिस्तान मध्ये गेलो मी जेव्हा लाहोर, कराची मध्ये गेलो तिथे दुसावस नाही. कराचीमध्ये मी एका हॉटेल मध्ये गेलो तेव्हा तिथे माझ्याकडून घेतले नाही कारण तुम्ही आमचे पाहुणे आहात असं सांगितले गेलं. सचिनचा आम्ही खेळ बघतो असंही मला त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी त्याचं कौतुकही केलं हा अनुभव मी घेतला आहे. पाकिस्तान मधला सामान्य माणूस आपला विरोधक नाही. आपल्या भारत देशात जात धर्म याचा कधी विचार नव्हता तो आता पसरवला जातो आहे. अशांना धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.