शरद पवारांच्या काटेवाडीत बावनकुळेंची बैठक, सुळेंना पाडण्यासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना येत्या लोकसभा निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या खांद्यावर या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपचं राज्यातील नेतृत्व कामाला लागलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बावनकुळे शरद पवारांच्या काटेवाडीत बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काटेवाडीला विशेष महत्त्व का आहे?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं जन्मगाव म्हणजे काटेवाडी. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवरती पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडूण गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच काटेवाडीत राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. शरद पवार ज्या मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात करतात त्याच मंदिरात नारळ फोडून चंद्रशेखर बावनकुळे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

भाजपचं मायक्रो प्लॅनिंग, युवा वॉरियर शाखेचं उद्घाटन, अनेकांचा पक्षप्रवेश

”बारामती लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाद्वारे नियोजन केलं जात आहे. बारामती लोकसभा मतदार संघासाठी प्रभारी म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली आहे. तसेच आज प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश करून घेणार आहोत. तरुण कार्यकर्ते भाजपशी जोडले जाणार आहेत. यासाठी भाजपा युवा वॉरियर शाखेचं उद्घाटन केलं जाणार आहे.” अशी माहिती पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदिप सातव यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमदार राम शिंदेंच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी राम शिंदेंच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ”बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक जिंकायचीच त्यामुळे आम्ही तयारी करत आहोत. 2014 आणि 2019 ची निवडणुक आम्ही हरलो. 2024 चा उमेदवार ठरवायचा आहे. 2014 ते 2024 या काळात प्रचंड बदल झाला आहे. जर आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामतीही जिंकू शकतो. सुप्रिया सुळे यांनी वाईनाड सारखा मतदार संघ शोधावा.” असं सल्ला राम शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता.

निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर अजित पवार काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्या नंतर पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना अजित पवार म्हणाले ”अमुक अमुक जण बारामतीला येणार आहेत, तुम्हचं काय म्हणनं आहे. येऊदे ना बारामतीला, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का? ती सर्वाची आहे. उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचे स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्ट्रात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले. म्हणुन पत्रकारांना माझी हात जोडुन विनंती आहे तुम्हाला काही दाखवायला नसेल तर असले काही दाखवू नका” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT