Uddhav Thackeray :”एकीकडे गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू, दुसरीकडे निष्ठावंत शिवसैनिकांचे अश्रू…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. शिवसेना भवन या ठिकाणी हा संवाद त्यांनी साधला. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी उठाव केला. त्यानंतर काय काय घडामोडी घडल्या ते महाराष्ट्राने पाहिलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेना पक्ष अजून फुटण्यापासून वाचवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. आज उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?

माझ्या शिवसैनिक भगिनींनो

काल शंभर टक्के बांधव होते, आज समोर शंभर टक्के भगिनी आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि मोकळेपणाने सांगतो की शक्ती मिळाल्याचा अनुभव आला आहे. तुम्ही सर्वजणी अमाप कष्ट करत आहात. तुमच्या भावना बोलता आहात, बहुतेक जणींच्या मला डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मी असा उभा आहे, एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू…यामधून मला मार्ग काढायचा आहे. पण मार्ग तर नक्की काढणार.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मला खंत एका गोष्टीची आहे, 25-30 वर्ष सोबत राहिलो ते आपले एकदम कट्टर शत्रू झाले. 25-30 वर्ष ज्यांच्या विरुद्ध लढलो ते काँग्रेस, राष्ट्रवादी…आपल्याला सांगत होते की काँग्रेस…शरद पवार…त्यांच्यावर शिक्काचं आहे. पण ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला. हेच माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत होते ते अजून सोबत आहेत, पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला.

तुमची परिस्थिती फारच वेगळी असते. सगळ्याजणींची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. तुम्हाला घर दार, मुलं बाळ, सगळ्या गोष्टी सांभाळून निष्ठेने करावं लागतंय, आणि तुम्ही ते करताय. काहीवेळा हा विचार येतो की 50 टक्के आरक्षण पेक्षा गेल्या वेळेस 100 टक्के महिलांना उमेदवारी दिली असती तर कोणी हरामखोरी केलीच नसती.

ADVERTISEMENT

विधानपरिषद मध्ये दोन्ही जागा जिंकून येतील असं म्हणत होते, आले देखील निवडून. पण 12 मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचं कपट कारस्थान कधीपासून सुरू होतं, काल ते विधानसभेत गुपित खुललं. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा…गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला…रिक्षाचा ब्रेक फेल…त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर…आता चालवा सरकार.

ADVERTISEMENT

तुम्हा महिला शिवसैनिकांना आजपर्यंत काहीच दिलं नाही आहे. शिवसेना प्रामुखांच्या मुलाला खुर्चीतून खाली खेचला, त्यांचं सुख लख लाभो, किती पर्यंत राहील बघू. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत त्यांना मोजावी लागणार. विरोधी पक्षनेते पद आलं तेव्हा आम्ही त्यांनाच दिलं. ही आता जोडगोळी आली…2019 साली ठरल्याप्रमाणे केलं असतं तर फुकटमध्ये तुम्हाला केलं असतं. एवढा खर्च कशाला केला? का माझ्या आमदारांना पळवलं?

भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढवायचं आहे. यांना शिवसेना नकोय. नुसती शिवसेना फोडा नाही तर शिवसेना संपवा हा त्यांचा डाव आहे, त्यासाठी हा दाढीवाला चेहरा पुढे केला. त्यांना देखील माहिती नाही आहे. त्यांना दाबून ठेवलं आहे. त्यांचा गळा आवळून ठेवला आहे. ताबा त्यांच्या हातात आहे. काल बघितलं ना…पुढ्यातून माईक खेचला. मी मुख्यमंत्री असताना असं कधी झालं नाही. पण काल बघितलं त्यांच्या पुढ्यातून माईक खेचला, त्यांना देखील कळालं नाही. आता माईक खेचलाय उद्या काय खेचतील ते बघा.

काय झाडी…काय ईडी…आनंदात आहेत…ईडीच्या धाडीच्या धाक दाखवून त्यांना इथून घेऊन गेलेत. आता बघा काय होतं ते. कळेलच त्यांना यापुढे. मी 19 जून 1966 च्या मानसिकतेचा आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हतं, त्या मानसिकतेतुन आपल्याला लढायचं आहे.

तुम्हाला बघून मला हत्तीपेक्षा हजारो वाघांचं बळ आलं आहे. पुन्हा एकदा तेजाकडे वाटचाल करूया. याच्यापुढे पहिला मान महिलांना द्यायचा. तुम्ही या राजकारणाकडे लक्ष देऊ नका, त्याला तोंड द्यायला मी सज्ज आहे. तुम्ही निवडणुकांकडे लक्ष ठेवा. या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. तुम्हाला या गद्दारांच्या विरोधातील रागाचा निखारा फुलवायचा आहे. कोणत्याही निवडणुका येउद्या यांना भुईसपाट करायचं आहे. या मातृशक्तीला मापासून वंदन करतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं भाषण संपवलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT