
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न चिघळला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण झाला असून, विरोधकांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह दिल्लीतील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. खासदार संजय राऊतांनीही या वादामागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे", अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर केली.
"ज्या पद्धतीने 24 तासांपासून सीमाभागात सरकारी प्रेरणेनं, कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होताहेत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही?", असा सवाल करत संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं.
संजय राऊत पुढे म्हणाले की, "आमचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत जाणार असल्याचं वाचलं. काय उपयोग आहे? महाराष्ट्रासंदर्भात काय चाललंय, हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं. अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधी आली नव्हती. इतकं हतबल सरकार या महाराष्ट्राने गेल्या 55 वर्षात बघितलेलं नाही."
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला.
राऊत म्हणाले, "आज अचानक हा प्रश्न उफाळला आहे. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. आमची मागणी आहे की, ज्या महाशक्तीने हे सरकार आणि मुख्यमंत्री बसवलेत त्यांना आमचं सांगण आहे की, ताबडतोब बेळगावसह सीमा भाग केंद्र शासित करा, नाहीतर या महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात", असं म्हणत संजय राऊतांनी बेळगावसह सीमाभाग केंद्र शासित प्रदेश करण्याची मागणी केली.