राष्ट्रवादीच्या बैठकीचे अजित पवारांनाच नाही निमंत्रण? नेमकं कारण काय?
मुंबईत होत असलेल्या राष्ट्रवादीच्या एका बैठकीला अजित पवार यांना निमंत्रणच नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ अजूनही शांत होताना दिसत नाही. आता मुंबईत होत असलेल्या राष्ट्रवादीच्या एका बैठकीला अजित पवार यांना निमंत्रणच नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) संबोधित करणार आहेत. सोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, आदिती तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत अजित पवारांचे नाव नसल्याची माहिती आहे. (NCP Leader Ajit Pawar was not invited to a party meeting in Mumbai)
राष्ट्रवादीची ही बैठक आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र बैठकीच्यावेळी अजित पवार पुण्यात असणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यमवर्ती बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून मला बाजूला करण्यात आले आहे, असा गैरसमज कोणी करू नये. माझे कार्यक्रम नियोजीत आहेत. आज संध्याकाळी एका माध्यम समुहातर्फे मुलाखत घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांचं राज्यपालांना पत्र, केली मोठी मागणी…
अजित पवार भाजपसोबत जातील :
अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, असा दावा शिवसेना (UBT) गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच केला होता. संजय राऊतांनी 16 एप्रिलला रविवारी रोखठोक सदरात महाराष्ट्रात फोडाफोडीचा सीझन टू सुरू असल्याचा दावा केला. आतापर्यंत दबक्या आवाज सुरू असलेल्या या चर्चांना राऊतांनी शरद पवारांचा हवाला दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
यावर अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत”.










