'चार खर्च कमी करावे लागले तरी चालेल पण...', CM फडणवीस असं म्हणाले अन् केली प्रचंड मोठी घोषणा
CM Devendra Fadnavis: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेलं प्रचंड नुकसान लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी 32 हजार कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केली.
ADVERTISEMENT

मुंबई: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (7 ऑक्टोबर) मुंबईत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, 'आम्ही तिघांनी बसून यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की, चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्यासंदर्भात मागेपुढे पाहू नये. कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचं संकट आहे.' असं ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक मदत पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला आहे. या मदतीचे वाटप दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेती, घरे, दुकाने आणि पशुधन यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात एकूण 1 कोटी हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पीक उत्पादन होते, त्यापैकी 68 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा फटका 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 महसूल मंडळांना बसला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व भागांना मदत पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा यावेळी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजमधील महत्त्वाच्या घोषणा
मदत पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी थेट मदत देण्यात येईल. प्रति हेक्टर 47 हजार रुपयांची रोख रक्कम आणि नरेगा योजनेद्वारे प्रति हेक्टर 3 लाख रुपये इतकी मदत मिळेल. याशिवाय, रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10 हजार रुपयांची मदत देण्यात येईल. पीक नुकसानीसाठी एकूण 6175 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर अतिरिक्त मदतीसाठी 6500 कोटी रुपयांची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.