Datta Dalvi : थेट शिंदेंनाच ललकारलं, कोण आहेत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक दत्ता दळवी?
बाळासाहेब ठाकरे यांचा सामान्य कार्यकर्ता ते अगदी मुंबईचा महापौर असा प्रवास करणारे दत्ता दळवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते कधी बैलांच्या झुंजीमुळे चर्चेत येतात तर त्यांच्या तडकाफडकी स्वभावामुळे चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यामुळे.
ADVERTISEMENT

Datta Dalvi: ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली ती कट्टर शिवसैनिकांमुळे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाकेला ओ देऊन अनेक शिवसैनिक तयार झाल्यामुळेच कधी काळी लावलेल्या शिवसेना (Shivsena) नावाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला. आजच्या काळात शिवसेना हा मोठा राजकीय पक्ष असला तरी शिवसेनेच्या वेगळ्या स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यातील एक स्टाईल म्हणजे शिवसेनेची रांगडी आणि शिवराळ भाषा. शिवसेनेच्या या स्टाईलची आज पुन्हा एकदा चर्चा झाली ती दत्ता दळवी यांच्यामुळे. दत्ता दळवी यांनी भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविषयी अपशब्द वापरला आणि त्यांना आज अटक झाली अन् वादाला तोंड फुटले.
उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीर
आज सकाळी त्यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेत्यांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आणि दत्ता दळवी नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. ते दत्ता दळवी नेमके कोण आहेत. शाखा प्रमुख ते मुंबईचे महापौर असा प्रवास करणाऱ्या दत्ता दळवी यांचा राजकीय प्रवास कसा होता. शिवसेना फुटल्यानंतर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभा राहिले ते राज्यासह देशातील अनेक नेत्यांनी पाहिले आहे.
हिंदूहृदयसम्राट शब्दावरून टीका
कोकणवासियांच्या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली. राजस्थानमध्ये प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं लिहिण्यात आले होते. त्यावरून दत्ता दळवी यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर हा वाद विकोपाला जात त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर त्यांना अटकही झाली आहे.
साधा शिवसैनिक ते महापौर
ज्या दत्ता दळवी यांना अटक करून 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्या दत्ता दळवींनी आपला राजकीय प्रवासही अगदी सामान्य शिवसैनिकापासून केला आहे. म्हणूनच आजही ईशान्य मुंबईतील राजकारण त्यांच्या नावाशिवाय पुढं जात नाही. कारण विक्रोळी भागातून साधा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यावेळेपासून त्यांच्या आक्रमक आणि धाडसीपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे.