Amit Shah Aaj Tak Exclusive: ‘लॉकडाऊनचा प्रश्नच नाही.. गॅस, पेट्रोलचा आपल्याकडे पुरेसा साठा’
Amit Shah Aaj Tak Exclusive interview: देशात सध्या लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. 'आज तक'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘आज तक’ वृत्तवाहिनीशी दिलेल्या विशेष एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत देशातील वर्तमान परिस्थितीवर मोठे भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.”जगभरात निर्माण झालेल्या संकटामुळे अनेक देशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना, भारताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उत्तम व्यवस्था केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अमित शाहा नेमके काय म्हणाले?
मुलाखतीत अमित शाह म्हणाले, “खरं तर जगभरात संकट आहे. भारतालाही काही अडचणींचा सामना करावा लागतोय. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने खूप चांगली व्यवस्था केली आहे. कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. सगळं सुरळीत सुरू आहे. पुरेशा प्रमाणात आपल्याकडे या गोष्टींचा साठा आहे.”
जगभरातील संकट आणि भारताची सज्जता
सध्या जगभरात इंधन पुरवठा, ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे अनेक विकसित आणि विकासशील देशांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर गृहमंत्री शाह यांनी भारताची ‘स्वयंपूर्ण’ तयारी अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, सरकारने नियोजन करून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा केला आहे.









