KCR यांच्यावर महाराष्ट्रात येताच ठपका, शरद पवारांनंतर संजय राऊत काय बोलले?
600 गाड्या घेऊन जोरदार शक्तिप्रर्दशन घडवणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीवर आता महाविकास आघाडीने भाजपची बी टीम असल्याचा ठपका ठेवला आहे.
ADVERTISEMENT

KCR in Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात गुलाबी लाट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर अशा सीमाभागाला लागून असलेल्या जिल्ह्यांत केसीआर त्यांच्या पक्षाचं मूळ रुजवू पाहत आहेत. केसीआर यांच्या बीआरएसमुळे महाराष्ट्रात कुणाला फटका बसणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 600 गाड्या घेऊन जोरदार शक्तिप्रर्दशन घडवणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीवर आता महाविकास आघाडीने भाजपची बी टीम असल्याचा ठपका ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत राष्ट्र समितीवर बोलताना बी टीमचा उल्लेख करत सूचक भाष्य केलं होतं. त्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी बीआरएसला बी टीम असल्याचा दावा केलाय. दोन्ही नेते नेमके काय म्हणालेत, ते आधी बघुयात…
केसीआर यांच्या बीआरएसबद्दल शरद पवार काय म्हणालेले?
रावेरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांना केसीआर यांच्या बीआरएसमुळे कुणाला फटका बसेल?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले होते की, “मागची निवडणूक (विधानसभा निवडणूक 2019) तुम्ही आठवली, तर आम्हाला थोडं नुकसान सहन करावं लागलं. ते नुकसान वंचितच्या वतीने त्यांनी जी काही मते वळवली त्यामुळे झालं. लोकशाहीमध्ये त्यांचा (बीआरएस) अधिकार आहे. मी नाही म्हणत नाही. कुणालाही कुठेही जाऊन काम करायचा अधिकार आहे.”
हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
“महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे बघितलं, तर माहिती नाही. काही वेळेला राजकारणात स्वतः लढायचं असतं. आणि दुसरं म्हणजे एक-दोन टीम तयार करायच्या असतात, पायात पाय घालण्यासाठी… त्याला साधारणतः राजकारणातील बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की काय, हे आता कळेल”, असं पवार म्हणाले होते. पण, पवारांनी वंचितचा उल्लेख केला, त्यामुळे त्यांचा रोख बीआरएसही बी टीम आहे, असाच काहीसा होता.










