Raj Thackeray : छावा सिनेमाचा फिव्हर ते औरंगजेबाची कबर, राज ठाकरे यांनी 'तो' नरेटीव्ह हाणून पाडला?
Raj Thackeray Speech : देशातील तरुणांनी व्हॉट्सॲपवर इतिहास वाचू नये, हा फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. इतिहासातील गोष्टींनी आमचं लक्ष विचलित केलं. लोकांनी इतिहास पुस्तकातून वाचावा, इतिहासाच्या नावावर लोकांना भांडायला लावलं जातंय असं राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरुन काय म्हटलं?
इतिहासातले उदाहरणं देत राज ठाकरेंचा कुणावर निशाणा
राज ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ काय?
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर काल मनसैनिकांना संबोधित केलं. राज्यात मागच्या काळात घडलेल्या अनेक घटनांवर त्यांनी यावेळी त्यांनी भाष्य केलं. "आम्हाला पाण्याचे स्त्रोत आणि झाडांची चिंता नाही. आम्हाला औरंगजेबाच्या कबरीची काळजी वाटते. चित्रपटांच्या माध्यमातून जे हिंदू जागृत होत आहेत त्यांचा काही उपयोग नाही" असं स्पष्ट मत त्यांनी नोंदवलं.
राज ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना कुंभ मेळ्याचा उल्लेख करत तिथल्या दूषित पाण्याचे व्हिडीओ दाखवले. मुंबईतील लुप्त होत गेलेल्या नद्या, राज्यातील प्रदुषित नद्या, नॅशनल पार्क अशा अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केलं. तसंच छावा चित्रपट, औरंगजेबाची कबर, अफजल खानाची कबर या सर्व मुद्यांवर राज ठाकरेंनी थेटपणे आपलं मत व्यक्त केलं. मागच्या काळात मंत्री नितेश राणे, भाजप-शिवसेनेचे नेते, हिंदूत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केली होती. या सगळ्या गोष्टींवर कुणाचंही नाव न घेता स्पष्टपणेे राज ठाकरे यांनी भूमिका मांडली.
सजावट काढा, कबर राहूद्या...
छावा सिनेमा आल्यानंतर चित्रपटात दाखवलेली औरंगजेबाची क्रूरता पाहून, संताप व्यक्त केला जात होता. अनेक ठिकाणी औरंगजेबाची प्रतिमा जाळण्यात आली, कबर काढण्याची मागणी करण्यात आली. याचदरम्यान, नागपूरममध्ये तणाव आणि हिंसाचार झाला. राज्यातील या संपूर्ण वातावरणावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. "औरंगजेबाला मराठ्यांनी इथंच गाडलं, हे दाखवण्यासाठी समाधी राहूद्या, फक्त सजावट काढा" असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
अनेक हिंदू मुघलांसाठीही लढले
राज ठाकरे असंही म्हणाले की, आम्हाला पाण्याचे स्त्रोत आणि झाडांची चिंता नाही. आम्हाला औरंगजेबाच्या कबरीची काळजी वाटते. औरंगजेबाच्या कबरीजवळ फलक लावावा की, याला आम्ही मारलंय. शिवाजी महाराजांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व जादुई होतं. शिवराय जन्माला आले, तेव्हा इथे काहीच नव्हतं, हा परिसर वेगळा होता. शिवाजी महाराजांचे वडील निजामासोबत काम करत होते. शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली तेव्हा अफझलखानाचे दूत ब्राह्मण होते, तर शिवाजी महाराजांचेही ब्राम्हण होते. दोन्हीकडे सगळ्याच जातीधर्माचे लोक होते. त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. आग्रा येथे संभाजी महाराजांनी 5000 रुपयांची भेट स्वीकारली होती. तो राजकारणाचा भाग होता. अनेक हिंदू नेते मुघलांसाठी आमच्यासोबत लढले असं त्यांनी सांगितलं.










