उद्धव ठाकरेंचा राजीनामा, सुप्रीम कोर्टाचा निकाल; शरद पवारांचं विश्लेषण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा, राज्यपालांनी घेतलेला निर्णय आणि विधानसभा अध्यक्षाबद्दल भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर एक महत्त्वाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आज (11 मे) दिला. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रम आणि नबाम रेबिया प्रकरणावर दिलेल्या निकालावेळची स्थिती वेगवेगळी असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचा राजीनामा, राज्यपालाचा निर्णय आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
शरद पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबद्दल सुप्रीम कोर्टाने मांडलेल्या भूमिकेवर पवार म्हणाले, “त्याची काही चर्चा करण्यात आता अर्थ नाही. माझ्या पुस्तकात मी लिहिलंय ते. त्या पुस्तकात हा विषय आहे. त्यात मी स्वच्छ म्हटलेलं आहे. मी स्वच्छ म्हटल्यामुळे आमचे काही मित्र नाराजही झाले. पण, त्यात नाराज करण्याचा हेतू नव्हता. वस्तुस्थिती होती आणि ती गोष्ट सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली. जे झालं, ते झालं. आम्ही, उद्धव ठाकरे, काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरूवात करू.”
हेही वाचा >> Chief Minister: ‘हो, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं ती चूक का केली?
राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सुप्रीम कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणांवर शरद पवार म्हणाले, “राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते, याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे. मला वाटतं की, जाहीरपणाने ते इथे असताना मी त्यावर एकदा बोललो आहे. तेव्हाही मी म्हणालो होतो की, घटनेमध्ये राज्यपाल हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनची अप्रतिष्ठा कशी केली जाते, याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रात दिसलं. सुदैवाने ते आज इथे नाहीयेत. त्यामुळे अधिक भाष्य करण्याची गरज नाही.”
“निकालाची कॉपी वाचून प्रतिक्रिया देणं योग्य होईल. पण, त्यामधील पहिले दोन तीन मुद्दे मी पाहिले. त्याच्यात कोर्टाने साधारणतः जे इथे राज्यकर्ते आहेत, त्याच्यासंबंधीची तीव्र भूमिका मांडलेली आहे.”










