Maharashtra BJP : “ठाकरे, राऊत आता तरी शहाणे व्हा, हा तमाशा बंद करा”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mla Disqualification verdict : Maharashtra bjp hits out at uddhav Thackeray and sanjay Raut.
Mla Disqualification verdict : Maharashtra bjp hits out at uddhav Thackeray and sanjay Raut.
social share
google news

Maharashtra Politics News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Mla Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निकाल दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवत नार्वेकरांनी शिंदे गट हाच मूळ शिवसेना असल्याचे निकालात स्पष्ट केले. या निकालानंतर प्रतिक्रिया उमटत आहेत. या निकालावर उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह विरोधकांनी टीका केली. उद्धव ठाकरे-संजय राऊतांनी नार्वेकरांवरच निशाणा साधल्यानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

” आता तरी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी बिन पैशाचा तमाशा थांबवावा”, असे म्हणत महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे.

रडारडी बंद करा; भाजपचा टोला

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “लोकशाहीची हत्या, काळा दिवस, गद्दारी, संगनमत, नियम धाब्यावर बसवले, दिल्लीवरून लिहिलेली स्क्रिप्ट, हुकूमशाही ह्या बाराखडीची रडारडी बंद करावी.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सर्व निर्णय हे घटनेच्या चौकटीत घेतले जातात. सरकार परत आणा म्हणणारे सर्वोच्च न्यायालयात तोंडावर आपटले, कोण तर उद्धव ठाकरे… अहंकारात हिंदुत्व सोडलं, आमदार-खासदार आणि कार्यकर्ते गमावले, कुणी तर उद्धव ठाकरे यांनी”, असे म्हणत उपाध्ये यांनी ठाकरेंना सुनावलं आहे.

हेही वाचा >> Shiv Sena च्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचा ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल

“निवडणूक आयोगासमोर उघडे पडले कोण? तर उद्धव ठाकरे… आता विधानसभा अध्यक्षांसमोर काहीही सिद्ध करता आले नाही ! उद्धव ठाकरे, संजय राऊत आता तरी शहाणे व्हा, हा तमाशा बंद करा…”, असा सल्लावजा टोला उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

नार्वेकरांनी सर्व आमदारांना ठरवलं पात्र

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. तर शिंदे गटानेही ठाकरे गटातील आमदारांविरोधात व्हीपच उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

हेही वाचा >> शिवसेना परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ आहे पर्याय

दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना पात्र ठरवले. व्हीपचे उल्लंघन केल्याचे सिद्ध करता आले नाही, असे सांगत नार्वेकरांनी याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे दोन्ही गटाचे आमदार पात्र झाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांवर साधला निशाणा

आदित्य ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं की, “हा निकाल म्हणजे ह्या ट्रिब्युनलच्या निर्लज्जपणाचा कळस आहे! भाजप प्रणित गद्दारांची राजवट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे उघड आहे.”

हेही वाचा >> निकालानंतर नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदार अपात्रतेचा निर्णय ‘त्या’ निकषावरच

“लोकशाही संपवण्यासाठी त्यांना राज्यघटना पुन्हा लिहायची आहे. आज ह्या निकालाने आपल्या राज्यातील लोकशाही आणि राज्यघटनेच्या तत्त्वांचा आणि स्तंभांचा अधिकृतपणे खून केला आहे. लोकशाही पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढा देऊ”, असा ठाकरे म्हणाले.

“हा निकाल फक्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबद्दल नव्हता. हे आपल्या देशाच्या संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल आहे! आम्हाला आशा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय ह्या लांच्छनास्पद राजकीय खेळापासून संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करेल”, असे आदित्य ठाकरेंनी निकालानंतर म्हटले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT