मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

why BJP has taken out OBC Jagar Yatra in the Maharashtra?
why BJP has taken out OBC Jagar Yatra in the Maharashtra?
social share
google news

Bjp OBC politics explained in marathi : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने निजाम काळात कुणबी म्हणून नोंद असणाऱ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढला. पण, नंतर जरांगे पाटलांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. जरांगे पाटलांच्या या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. एकीकडे मराठा आरक्षणावरुन राजकारण सुरु असताना भाजपने ओबीसी जागर यात्रा का काढाली? तेच समजून घ्या… (Why OBC voter important to BJP)

भाजपकडून ओबीसी जागर यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही जागर यात्रा काढली जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसींची संख्या अधिक असणाऱ्या विदर्भावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या यात्रेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘विदर्भाच्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक योजना आणल्या आहेत. या यात्रेच्या माध्यमातून सरकारची चांगली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहचवणार आहोत.’

मराठा विरुद्ध ओबीसी

गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण केलं. तर धनगर आरक्षणासाठी देखील राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला. ओबीसी समाजाकडून आंदोलनं करण्यात आली, त्याचबरोबर चंद्रपूरात उपोषण देखील करण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपचं लक्ष्य ओबीसी मतदारांवर का?

ओबीसी हा भाजपचा पारंपरिक मतदार राहिला आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी ‘माधवं’ सुत्रं स्वीकारत भाजपचा विस्तार केला. यात माळी, धनगर, वंजारी या समाजाला भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. २०१४ आणि २०१९ साली भाजपला ओबीसी समाजाचं मोठं मतदान झालं होतं.

हेही वाचा >> Nanded Hospital : ‘तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र…’; राज ठाकरे कडाडले

आता आरक्षणाच्या मुद्यावरुन ओबीसी समाजाला नाराज करुन चालणार नाही, हे भाजप ओळखून आहे. त्यातच निजाम प्रशासनाच्या नोदींमध्ये ज्यांची मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून नोंद आहे, त्या मराठा समजातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढण्यात आल्याने ओबीसी समाज नाराज झाल्याचे चित्र आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘पत्रकारांना ढाब्यावर न्या’, चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? कारणही सांगितलं

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी मागणी देखील विरोधीपक्षाकडून करण्यात आली. विरोधीपक्षाने देखील ओबीसी समाजाचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसी प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्याचबरोबर एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले असताना ओबीसी समाजाचं उपोषण सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेले होते.

ADVERTISEMENT

विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद सुरु असताना तिकडे संसदेच्या विशेष अधिवेशनात राहुल गांधी यांनी ओबीसीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या ९० सचिवांमध्ये केवळ ३ ओबीसी समजाचे आहेत अशी आकडेवारी राहुल गांधी यांनी दिली होती. या आकडेवारीवरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधी आणि काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा >> NCP: अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली?

या सगळ्यामुळे ओबीसी मतदार भाजपासून दुरावला जाण्याची भीती आहे. दुसरीकडे विरोधपक्षाकडून देखील ओबीसी मतदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने विरोधीपक्ष नेते पदावर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली. विरोधीपक्ष नेते पदासाठी बाळासाहेब थोरात यांच्यापासून अनेक काँग्रेसचे नेते असताना काँग्रेस नेतृत्वाकडून वडेट्टीवार यांची वर्णी लावण्यात आली. चंद्रकांत पाटलांनंतर बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष करुन भाजपकडून आधीच ओबीसी मतदारांकडे आपला मोर्चा वळवला होता.

व्हिडीओ >> भाजपाचं पुण्याकडे शहराकडे विशेष लक्ष का आहे?

सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपला पारंपारिक मतदार आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून भाजपकडून ओबीसी जागर यात्रा काढण्यात येत आहे. या रॅलीच्या माध्यमातून भाजप एकप्रकारे येऊ घातलेल्या निवडणुकांचीच तयारी करत आहे. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा कोअर मतदार आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होतं का हे येत्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होऊ शकणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT