विधान परिषद निवडणूक: महायुतीत कुठे-कुठे बंडखोरी.. 'हे' उमेदवार ठरणार डोकेदुखी?
विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी नाराजी नाट्य दिसून आलं. पुण्यात बराचकाळ हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जाणून घ्या नेमकी कुठे-कुठे बंडखोरी झाली आणि त्याचा या निवडणुकीवर कसा परिणाम होणार.
ADVERTISEMENT
पुणे: विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी नाराजी आणि बंडखोरीचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः पुण्यात मोठा राजकीय ड्रामा घडला. सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला. टिंगरे यांचा अर्ज 'डमी' असल्याचे सांगितले जात असले तरी उमेदवारी न मिळाल्याची त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
महायुतीकडे विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमताचे गणित असतानाही मित्रपक्षांमध्ये असंतोष उफाळून आल्याचे दिसले. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतल्याने निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक मतदारसंघांत नाराज नेते आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता अंतर्गत गटबाजी, नाराज नेते आणि बंडखोर उमेदवारांमुळे अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत पक्ष नेतृत्व बंडखोरांची मनधरणी करण्यात कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









