
महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची एकजूट किती आहे ते संध्याकाळी दिसून येईलच असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विधान परिषदेची निवडणूक आज पार पडते आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच सामना आजही रंगतोय. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे हातात हात घालून चालत आहेत. आम्हाला धोका आहे आणि समोरच्यांना धोका नाही का? आमचं काय ठरलं आणि काय नाही ठरलं हे मी आत्ता सांगणार नाही. आमच्या पक्षातली एकजूट तुम्हाला दिसून येईलच
आमदार पक्षाच्या कँपमध्ये असतानाही दबाव टाकला जात होता, धमक्यांचे फोन येत होते. मात्र या सगळ्याचा काहीही परिणाम होणार नाही. देशात लोकशाही आहे, लोकशाही मालक निर्माण झाले असले तरहीसुद्धा महाराष्ट्रात आम्ही या सगळ्यावर मात करू. महाराष्ट्र आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. विधान परिषदेची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहेच.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, मंत्री बाळासाहेब थोरात या सगळ्यांमध्ये संवाद आणि समन्वय आहे. आमच्यातली एकजूट किती आहे हे तुम्हाला संध्याकाळी दिसून येईलच असं म्हणत संजय राऊत यांनी विजयाचा दावा केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे हेच दिसून येतं आहे. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड या दोघांमध्ये काँटे की टक्कर आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत. तर मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात आहे.
काँग्रेसकडे ४४ आमदारांचं संख्याबळ आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना जिंकण्यासाठी २६ मतं मिळणं कठीण नाही. भाई जगताप यांना जिंकण्यासाठी ८ मतं कमी पडत आहेत. या ८ मतांसाठी जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.