
Maharashtra: लातूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या बराच चिघळला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून येथील दोन्ही राज्यात याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काल कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. कन्नड नागरिकांच्या या हिंसक कृत्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अशातच अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील उद्वेगजनक आहेत. मात्र, असं असलं तरीही महाराष्ट्रातील नागरिकांनी जो संयम दाखवला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. (workers of various organizations have done work that makes every marathi person proud karnataka has been taught a lesson)
एकीकडे महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ले होत असले तरी दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांचा आणि त्यांच्या चालकांना चक्क सत्कार केला जातोय. होय... अहिंसक पद्धतीने आपला निषेध व्यक्त करणाऱ्या काही समजदार नागरिकांची सध्या लातूरमध्ये बरीच चर्चा सुरु आहे.
...म्हणून महाराष्ट्र ग्रेट आहे!
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगाव जवळील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली होती. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
या कारवाईच्या निषेधार्थ राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र लातूर येथे या वादावर विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने कर्नाटक सरकारचा निषेध केला.
विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर बस स्थानकावर आलेल्या कर्नाटक महामंडळच्या बसच्या वाहक आणि चालक यांना पुष्पहार घालून शांततेचा संदेश दिला. कर्नाटक महामंडळाची बस लातूर येथील बस स्थानकात आली त्यावेळी आंदोनकर्त्यांनी बसवर ओम शांती असा संदेश लिहला.. तसेच तुम्ही बस फोडाल तर आम्ही जाळू मात्र यातून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानी शिवाय काहीही होणार नाही त्यामुळे कर्नाटक सरकार ने अशी भूमिका न घेण्याचे आवहान यावेळी आंदोलनकर्त्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला निषेध
दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली. एसटी, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होवू नये, अशी आमची चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशीही याबाबतबत माझी चर्चा झाली. इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत.'
दरम्यान, या सगळ्यानंतर सीमा भागातील वातावरण पूर्ववत होऊन तेथील मराठी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशीच आपण सगळे जण अपेक्षा व्यक्त करुया.