MS Dhoni : ‘पीआर आणि मार्केटिंग टीमने…’; गौतम गंभीर धोनीबद्दल हे काय बोलून गेला
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने धोनीला खेळातील हिरो मानणाऱ्या क्रिकेट चाहत्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पुन्हा एकदा धोनीला क्रिकेटचा हिरो मानणाऱ्या क्रिकेट चाहत्यांवर हल्ला चढवला आहे. क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहली आणि धोनीच्या पलिकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि प्रसारमाध्यमांनी या दोघांव्यतिरिक्त इतर खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे स्पष्ट मत गंभीरने मांडले. धोनीचे नाव न घेता गंभीर म्हणाला की, “एक पीआर टीम असते, जी एका क्रिकेटपटूला 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कपचा हिरो बनवून टाकते. पण, सत्य हे आहे की, युवराज सिंग हा खरा हिरो आहे, त्याच्यामुळेच आम्ही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलो.”
‘न्यूज 18’च्या कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला की, “आपण नेहमीच ऐकत आलोय की फक्त एकाच खेळाडूने आपल्याला वर्ल्ड कप चॅम्पियन बनवले आहे आणि मला वाटते की युवराज सिंगमुळेच आम्ही 2011 आणि 2007 च्या अंतिम फेरीत पोहोचलो. आणि दोन्ही स्पर्धांमध्ये तोच सामनावीर ठरला.”
युवराज विश्वचषकाचा खरा हिरो : गंभीर
गंभीर म्हणाला की, “2011 च्या विश्वचषकात युवराज सिंग प्लेअर ऑफ द सिरीज होता आणि शाहिद आफ्रिदीने 2007 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला होता. पण आमचे दुर्दैव हे आहे की जेव्हा आपण 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कपबद्दल बोलतो तेव्हा आपण युवराज सिंगचे नाव घेत नाही. असे का? कारण हा फक्त पीआर आणि मार्केटिंग टीमचा खेळ आहे, जिथे फक्त एका व्यक्तीला मोठं केलं जातं आणि इतरांना लहान केलं जातं.”
हेही वाचा >> WTC फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे
क्रिकेटपटूंना पीआर आणि मार्केटिंग… -गंभीर
गंभीर पुढे म्हणाला की, “कुणीही लहान नसतो. हा फक्त पीआर आणि मार्केटिंगचा खेळ आहे. केवळ एकाच व्यक्तीमुळे आम्ही 2007 आणि 2011 ला वर्ल्ड कप चॅम्पियन बनलो असे आम्हाला वारंवार सांगितले जाते. पण, त्यात संपूर्ण संघाचे योगदान होते. कोणताही एकच खेळाडू तुम्हाला मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकत नाही. असेच राहिले असते, तर भारताने 5-10 विश्वचषक जिंकले असते.”










