पुणे: पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग) जालिंदर सुपेकर यांचे नाव सातत्याने चर्चेत आल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. कालच सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांची थेट बदली करण्यात आली आहे. जो जालिंदर सुपेकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
ADVERTISEMENT
जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, (महाराष्ट्र राज्य, पुणे) या पदावरून थेट उप महासमादेशक होमगार्ड, (महाराष्ट्र राज्य, मुंबई) इथे बदली करण्यात आली आहे. कमी महत्त्वाच्या खात्यात ही बदली करण्यात आल्याने जालिंदर सुपेकर यांना आता महत्त्वाच्या पदावरून बाजूला करण्यात आलं आहे.
हे ही वाचा>> Vaishnavi Hagawane: हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय... वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने हुंडाबळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिच्या शरीरावर मारहाणीच्या 29 जखमा आढळल्या, ज्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप झाले. तिच्या सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 27 मे 2025 रोजी अटक करण्यात आली होती. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी लग्नात 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडी यासारख्या महागड्या वस्तू हुंडा म्हणून दिल्याचा दावा केला आहे.
जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप
जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे यांचे मामा आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सुपेकर यांच्यावर हगवणे कुटुंबाला पाठबळ दिल्याचा आरोप केला होता. तसेच, हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्याच्या प्रक्रियेत सुपेकर यांच्या स्वाक्षरीचा मुद्दा उपस्थित झालेला. यावर सुपेकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलेलं की, त्यांनी फक्त प्रशासकीय जबाबदारी पार पाडली होती, परवाना प्रक्रियेत तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीनंतरच स्वाक्षरी केली होती.
हे ही वाचा>> अमानुष मारहाण, मोबाईल हिसकावून पळाला.... मयुरीने CCTV दाखवले, हगवणे कुटुंबानं कसं छळलं ते सांगितलं
गृह विभागाची कारवाई
वैष्णवी प्रकरणातील आरोप आणि वाढत्या दबावानंतर गृह विभागाने 29 मे 2025 रोजी सुपेकर यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेतलेला. नाशिक विभागाची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव, नागपूरची उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि छत्रपती संभाजीनगरची अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे सुपेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही आता होत आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
