मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने ब्रेक घेतला असून, काही ठिकाणी तुरळक सरी वगळता फारसा पाऊस होताना दिसत नाही.
ADVERTISEMENT
नेमकं असं का घडलं? मान्सून अचानक का कमकुवत झाला? ढग महाराष्ट्राऐवजी ईशान्य भारताकडे का सरकत आहेत? जुलै महिनाभर हीच परिस्थिती राहणार का? आणि पाऊस नसतानाही उकाडा एवढा का वाढला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं हवामान परिस्थिती आणि IMD च्या अंदाजातून समोर येतात.
महाराष्ट्राभोवती कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नाही
सॅटेलाइट प्रतिमांचा अभ्यास केला असता महाराष्ट्राच्या आसपास कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नसल्याचे स्पष्ट दिसते. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचा पट्टा, चक्रीय अभिसरण किंवा अन्य कोणतीही पावसाला पोषक प्रणाली तयार झालेली नाही.
हे ही वाचा>> Maharashtra Weather : वातावरण फिरलं, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, IMD चा अंदाज
याशिवाय बंगालच्या उपसागरातही महाराष्ट्राकडे ओलावा खेचून आणणारी प्रभावी प्रणाली नसल्याने राज्यात ढगांची निर्मिती कमी होत आहे. परिणामी, राज्यात व्यापक स्वरूपाचा पाऊस होत नसल्याचे चित्र आहे.
ढग ईशान्य भारताकडे का वळत आहेत?
सध्या ईशान्य भारताच्या दिशेला दोन चक्रीय अभिसरण (Cyclonic Circulation) सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरातून येणारा मोठ्या प्रमाणातील ओलावा या प्रणालींकडे खेचला जात असल्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
या हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम विदर्भावर होऊ शकतो. मात्र त्या महाराष्ट्रात किती प्रभावी ठरतील, याबाबत अद्याप निश्चित संकेत नाहीत. त्यामुळे राज्यात लगेच मुसळधार पाऊस सुरू होईल, असे सध्या तरी म्हणता येत नाही.
IMD चा नेमका अंदाज काय?
15 जुलै: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, ठाणे, रायगड आणि पुणे घाट परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता नाही.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत किती पाणी? पाणीकपात थांबणार का?
16 जुलै: सोलापूर, धाराशिव, सातारा आणि सातारा घाट परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा अर्थ या भागात वीजांच्या कडकडाटासह ढगांची निर्मिती होऊ शकते; मात्र व्यापक स्वरूपाचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अद्याप कमी आहे.
पाऊस नाही, पण उकाडा एवढा का वाढला?
मुंबईसह कोकणात सध्या कमाल तापमान फारसे वाढलेले नसले, तरी नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आर्द्रता (Humidity). अरबी समुद्राचे तापमान वाढल्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस असले तरी शरीराला ते 34 ते 38 अंशांपर्यंत असल्यासारखे जाणवते. हवामान खात्याने उष्णतेची लाट (Heat Wave) जाहीर केलेली नसली तरी नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास होत आहे.
जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज काय सांगतो?
IMD च्या मासिक अंदाजानुसार जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावतीसह काही जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
धरणांवरील परिणामही चिंताजनक
पावसाचा जोर कमी झाल्याचा परिणाम राज्यातील धरणांवरही दिसू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही, तर जलसाठ्याबाबतची चिंता वाढू शकते.
ADVERTISEMENT












