Mumbai News : मुंबईतील ऐतिहासिक स्वामी विवेकानंद तलाव, जो 'वांद्रे तलाव' (Bandra Talao) म्हणून लोकप्रिय आहे, त्याचे पाणी उपसण्याचे (dewatering) आणि पुनरुज्जीवनाचे काम सुरु आहे. एका जैवविविधता सर्वेक्षणानुसार, या तलावाची स्थिती अत्यंत खराब असून त्यात कोणतीही जलचर सृष्टी जिवंत उरलेली नसल्याचे समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. वांद्रे पश्चिम येथे 7.5 एकर परिसरात पसरलेली ही 'ग्रेड-II' हेरिटेज वास्तू शहरातील प्रमुख शहरी तलावांपैकी एक आहे.
ADVERTISEMENT
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'एच-पश्चिम' (H-West) प्रभागाने केलेल्या एका जैवविविधता सर्वेक्षणानुसार, या गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे वर्णन 'अत्यंत खालावलेली आणि युट्रोफिक' असे करण्यात आले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात असलेल्या तलावातील पाण्याचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले आहे.
फक्त दोन मृत कासवं आढळली
'एच-पश्चिम' प्रभागाचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त दिनेश पल्लेवाड यांनी सांगितले की, तलावातील पाणी पूर्णपणे उपसण्यासाठी साधारण 15 ते 20 दिवस लागले. "सध्या गाळ काढण्याचे (desilting) काम सुरू असून ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. त्यानंतर, तलावातील नैसर्गिक झरे आणि पावसाच्या पाण्यामुळे ही परिसंस्था नव्याने सुरू होण्यास मदत होईल," असे पल्लेवाड म्हणाले. पाणी उपसण्याच्या प्रक्रियेदरम्यान तलावात एकही जिवंत जलचर प्रजाती आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तलावाच्या तळाशी फक्त दोन मृत कासवं आढळून आली.
हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि चंद्राच्या संघर्षामुळे व्यतिपात योगाची निर्मिती, 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ
पर्यावरणीय ऱ्हासामागे प्रचंड प्रदूषण
तलावातील प्रदूषण आणि पाण्याचे साचलेपण (stagnation) हेच प्रामुख्याने जलचरांच्या विनाशासाठी कारणीभूत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वांद्रे तलावाबद्दल केलेल्या अभ्यासानुसार, येथील सरासरी बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) पातळी सुमारे 100 मिग्रॅ/लिटर आढळली, जी एका निकोप तलावामध्ये सामान्यतः असणाऱ्या 5 मिग्रॅ/लिटरपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. उच्च BOD पातळी ही पाण्यातील प्रचंड प्रदूषण आणि ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे दर्शवते.
पुढील ऱ्हास रोखण्यासाठी, बीएमसी तलावाजवळ दररोज 1 दशलक्ष लीटर (1 MLD) क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. "प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा तलावात सोडले जाईल, ज्यामुळे पाण्याचे अभिसरण (circulation) सुधारेल आणि पाणी साचून राहणे आणि इतर समस्येचे निवारण होईल," असे पल्लेवाड यांनी पुढे सांगितले.
हे ही वाचा : समजून घ्या: अभिजीत दीपकेंचं राजकीय कनेक्शन काय? अचानक फॉलोअर्स का गेले विरोधात?
काम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन
कॅबिनेट मंत्री आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच पुनरुज्जीवनाच्या कामाची पाहणी केली आणि बीएमसी अधिकाऱ्यांना हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वांद्रे पश्चिमचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया म्हणाले की, या परिसरासाठी हा पुनरुज्जीवन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. "वांद्रे तलाव हा वांद्रे परिसराचा एक अविभाज्य भाग आहे. पाण्याचा खालावलेला दर्जा कदाचित अनेक दशकांपासून पाणी साचून राहिल्यामुळे आणि सततचे वायुवीजन (aeration) व ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे असावा. आम्ही आशा करतो की या चुका पुन्हा होणार नाहीत आणि नागरिकांना एक स्वच्छ तलाव मिळेल," असे झकेरिया म्हणाले.
ADVERTISEMENT











