Mumbai Monsoon : भारतात यंदा नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) सुरुवात आशादायक झाली असली, तरी अवघ्या काही आठवड्यांतच त्याचा वेग अचानकच मंदावला आहे. यामुळे देशात पावसाची मोठी पाणीटंचाई आणि प्रशांत महासागरात सातत्याने प्रबळ होत चाललेल्या 'अल निनो'च्या प्रभावाबाबत चिंता वाढली आहे. उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की, देशातील एका मोठ्या भागावरील मान्सूनच्या ढगांचे आच्छादन कमी झाले आहे. दक्षिण आणि मध्य भारतातील प्रगतीनंतर मान्सूनचा जोर अचानक ओसरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, 4 ते 15 जून दरम्यान देशात सरासरी 53.7 मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ 19.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, या काळात तब्बल 64 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. पावसाचा हा सुस्तपणा विशेषतः भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जाणवत असून, जूनचा पंधरवडा उलटूनही मुंबईकरांना अजूनही मुख्य पावसाची प्रतीक्षाच आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मान्सून कमकुवत
सामान्यतः मान्सून 9 ते 11 जून दरम्यान मुंबईत धडकतो; मात्र यंदा त्याचे आगमन आठवड्यापेक्षा अधिक काळ लांबले आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, मान्सूनला उर्वरित महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रात पुढे सरकण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मान्सूनची स्थिती सध्या कमालीची कमकुवत झाली आहे. 20 जूननंतर मान्सूनच्या प्रगतीसाठी काहीसे अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता असली, तरी सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्याशिवाय पडणार नसल्याची चिन्हे आहेत. पावसाच्या या मंद सुरुवातीमुळे देशातील एक मोठा भाग कोरडा राहिला आहे. देशातील 723 जिल्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे की, केवळ 103 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सामान्य पाऊस झाला आहे, तर 236 जिल्ह्यांत कमी आणि अन्य 202 जिल्ह्यांत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.
हे ही वाचा : अभिनेत्री संचिताचा सिनेसृष्टीत मानसिक छळ? कोणी केले सनसनाटी आरोप?
20 वर्षानंतर मुंबईत...
या रखडलेल्या प्रवासामुळे मुंबईत गेल्या 20 वर्षांतील सर्वांत कोरडा जून महिना नोंदवला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत सांताक्रूझ वेधशाळेत अवघा 13.1 मिमी, तर कुलाबा वेधशाळेत केवळ 5 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. मुंबईत जून महिन्याची पावसाची सरासरी तब्बल 526.3 मिमी इतकी असते. जर हीच स्थिती कायम राहिली, तर यंदाचा जून महिना 2014 च्या जून महिन्यासारखा असेल. त्यावेळी देखील मुंबईत अवघा 87.3 मिमी पाऊस झाला होता, जो आजवरच्या नीचांकी पावसांपैकी एक आहे. मान्सून लांबल्याचा थेट फटका आता जलसंपत्तीलाही बसू लागला आहे. महाराष्ट्रातील धरणांमध्ये सध्या केवळ 24.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, तर गुजरातच्या अनेक जलाशयांमधील पाणीपातळीतही झपाट्याने घट झाली आहे. गुजरातच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या सरदार सरोवर धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : बायकोचा परफेक्ट प्लॅन, पण प्रियकराच्या चुकीने सगळं समोर; नवऱ्याला का संपवलं?
मान्सूनसमोर मोठे आव्हान
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पुढे ढकलणारी कोणतीही सक्षम हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, जागतिक हवामान संस्थांनी प्रशांत महासागरात 'अल निनो'ची स्थिती विकसित होत असल्याचे स्पष्ट केले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, अल निनोचा थेट संबंध भारतातील कमकुवत मान्सूनशी राहिला आहे. 1950 पासून भारतात 16 वेळा अल निनोची स्थिती निर्माण झाली असून, त्यातील बहुतांश वर्षे दुष्काळ आणि पावसाच्या तुटीची ठरली आहेत. प्रशांत महासागराचे तापमान सातत्याने आणि झपाट्याने वाढत असल्याने, सप्टेंबरपर्यंत अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होऊ शकतो, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सून हंगामासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
ADVERTISEMENT











