Samruddhi mahamarg Accident, वैजापूर : भावाच्या मृत्यूनंतर शोकाकुल मनाने त्याचा पार्थिव घेऊन मूळ गावी निघालेल्या बहिणीच्या आयुष्यावर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा ट्रकला मागून जोरदार धक्का बसून झालेल्या भीषण अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात घडली.
ADVERTISEMENT
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव (वय 49, रा. मुंबई) असे आहे. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील असून सध्या कुटुंबासह मुंबईत वास्तव्यास होत्या. सावित्रीदेवी यांचे भाऊ लालजी यादव (वय 65) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. भावाच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मुंबईहून उत्तर प्रदेशातील मूळ गावी नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
रुग्णवाहिकेतून मृतदेहासह कुटुंबातील चार सदस्य आणि चालक असा प्रवास सुरू होता. मुंबईहून निघालेली रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावरून वेगात जात होती. जांबरगाव शिवाराजवळ रुग्णवाहिकेने समोर चाललेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. ट्रक आणि रुग्णवाहिकेची धडक इतकी जोरात होती की, वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
हेही वाचा : चिखलदरा : दरीत चाललेली ट्रॅव्हरल अडवताना चालक चिरडला गेला, पण एका झाडामुळे 20 प्रवाशांचा जीव वाचला
या अपघातात सावित्रीदेवी यादव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती भगवती प्रसाद यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेत असलेल्या उर्वरित तिघांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
या प्रकरणी सावित्रीदेवी यांचे नातेवाईक संदीपकुमार भगवती प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात रुग्णवाहिका अतिवेगात असल्याचे संकेत मिळत असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
भावाच्या मृत्यूचे दुःख पचवण्याआधीच बहिणीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने यादव कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. एकाच प्रवासात दोन मृत्यू आणि कुटुंबीयांचा आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. समृद्धी महामार्गावरील वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











