Telangana Crime News: तेलंगणामध्ये राहणाऱ्या तेजेश्वर नावाच्या 32 वर्षीय तरुणाचं ऐश्वर्या नावाच्या मुलीसोबत 18 मे 2025 रोजी लग्न झालं. मुलाकडच्या कुटुंबियांना ऐश्वर्या पसंत नव्हती, पण तेजेश्वरच्या प्रेमामुळे त्याचे घरचे या लग्नाला तयार झाले. अगदी आनंदात त्या दोघांचं लग्न पार पडलं आणि त्यानंतर काही दिवस त्यांचा संसार चांगला सुरू होता. मात्र, लग्नाच्या ठीक 30 दिवसांनंतर 18 जून रोजी एका गाडीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात तेजेश्वरचा मृतदेह सापडला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
तेलंगणामध्ये राहणाऱ्या तेजेश्वरचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे सापडला होता. त्याच्याकडे जमिनीचा सर्व्हे करण्याचं लायसन्स होतं. तो तेच काम करत असायचा. तेजेश्वरचा मृतदेह सापडण्याच्या आदल्या दिवशी तो जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी गेला होता. मात्र, संध्याकाळी तो घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याच दिवशी गाडीजवळ त्याचा मृतदेह सापडला.
पत्नी आणि सासूवर कुटुंबियांचा आरोप
याबद्दल पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली आणि त्यावेळी त्यावरुन तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि सासू सुजाता यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सगळ्यात पत्नी आणि तिच्या आईच्या प्रियकराचा सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं गेलं.
खरंतर, लग्नाआधी तेजेश्वरने त्याच्या कुटुंबियांना ऐश्वर्याबद्दल सांगितलं आणि कुटुंबियांनी होणार्या वधूबद्दल चौकशी केली. यादरम्यान, ऐश्वर्याचे एका बँक मॅनेजरशी प्रेमसंबंध असल्याचं त्यांना कळालं. हे कळाल्यानंतर त्यांनी तेजेश्वरला हे लग्न करण्यापासून रोखलं, परंतु तेजेश्वरचं ऐश्वर्यावर खूपच प्रेम असल्यामुळे त्याने त्याच्या कुटुंबियांचं काहीच ऐकलं नाही.
लग्नाच्या 5 दिवसांआधी झाली गायब
18 मे रोजी तेजेश्वरचं ऐश्वर्याशी लग्न होणार होतं मात्र त्यावेळी लग्नाच्या पाच दिवसांपूर्वीच ऐश्वर्या घरातून गायब झाली. दरम्यान, त्या काळात ऐश्वर्या तिच्या प्रियकरासोबत असल्याचं मुलाच्या कुटुंबियांना समजलं. तीन दिवसांनंतर ऐश्वर्या परत आल्यानंतर लग्नात हुंड्याच्या काळजीमुळे ती तिच्या मित्राच्या घरी गेल्याचं तिने सांगितलं. अशारितीने खोटं बोलून तिने तेजेश्वरला विश्वासात घेतलं. त्यामुळे कुटुंबियांनी नकार देऊनसुद्धा तेजेश्वर ऐश्वर्याशी लग्न करण्यावर अगदी ठाम होता.
हे ही वाचा: मित्राचे पत्नीसोबत अनैतिक शारीरिक संबंध असल्याचा संशय, पतीने मित्रालाच ठेचून केलं ठार
आई आणि बॉयफ्रेंडसोबत हत्येचा रटला कट
दोघांचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ऐश्वर्याचं वागणं बदलत चाललं होतं. ती नेहमी फोनवर बोलताना दिसायची आणि तेजेश्वरला खटकत होतं. मात्र वेळेनुसार तिच्या वागण्यात बदल होईल असं नेहमी त्याला वाटत राहिलं. परंतु, काही काळानंतर तेजेश्वरला तिच्या शंका यायला लागली आणि त्यावेळी तिने आपल्या आई आणि बॉयफ्रेंडसोबत मिळून तेजेश्वरची हत्या करण्याचा कट रचला. याबद्दल मारेकऱ्यांना सुपारी सुद्धा देण्यात आली होती.
कामाच्या ठिकाणी मारेकऱ्यांनी केली हत्या
17 जून रोजी तेजेश्वरला जमिनीचा सर्व्हे करण्यासंदर्भात एक कॉल आला होता. त्यावेळी तेजेश्वर त्या ठिकाणी पोहचल्यानंतर मारेकऱ्यांनी त्या ठिकाणी त्याची हत्या केली. तेजेश्वरच्या कुटुंबियांनी ऐश्वर्यावर आरोप केल्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले आणि लग्नानंतर सुद्धा ऐश्वर्या तिच्या प्रियकरासोबत सतत फोनवर बोलत असल्याचं तपासात समोर आलं. चौकशी करताना पोलिसांनी तिच्यावर दबाव टाकल्यानंतर तिला रडू कोसळलं आणि तिने सगळी घटना पोलिसांना सांगितली.
हे ही वाचा: दरीत तलाठी आणि विद्यार्थीनीचा मृतदेह, वरती चपला आणि पांढरी गाडी... जुन्नरमध्ये खळबळ, घटना काय?
ऐश्वर्याने केला गुन्हा कबूल
त्यावेळी ऐश्वर्यासोबत तिच्या आईचा सुद्धा हत्येच्या प्लॅनिंगमध्ये सहभाग असल्याचं तिने सांगितलं. खरंतर, या घटनेतील आरोपी बँक मॅनेजर असून त्याचे आधी ऐश्वर्याची आई सुजातासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यानंतर ऐश्वर्याने आपल्याच आईच्या प्रियकराशी जवळीक साधली आणि त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. त्यानंतर ऐश्वर्याने प्रॉपर्टीसाठी तेजेश्वरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न केलं. तेजेश्वरची हत्या करून त्याच्या प्रॉपर्टीवर ताबा मिळवून नंतर आपल्या प्रियकरासोबत राहणं हाच तिचा हेतू होता. सध्या पोलिसांनी ऐश्वर्या आणि सुजाताला अटक केली आहे. आरोपी बँक मॅनेजर आणि सुपारी किलर्स म्हणजेच तेजेश्वरच्या मारेकऱ्यांच्या शोधात पोलिसांची टीम कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
ADVERTISEMENT
