13 वर्षीय बहीण नदीत, तर 3 वर्षीय भाऊ विहिरीत सापडला; चिमुरड्यांचा काय दोष?

सख्ख्या भाऊ-बहिणीचे मृतदेह आढळल्याच्या वेदनादायी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मृतांचे आई-वडील खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करतात.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:16 PM • 02 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीय बहीण नदीत, तर 3 वर्षीय भाऊ विहिरीत सापडला

point

चिमुरड्यांचा काय दोष?

Crime News : सख्ख्या भाऊ-बहिणीचे मृतदेह आढळल्याच्या वेदनादायी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष टास्क फोर्सची (SIT) स्थापना केली असून तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. भावाचा मृतदेह विहिरीत, तर बहिणीचा मृतदेह नदीत आढळून आला. छत्तीसगडच्या हजारीबाग परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

आधी बहिण, नतंर भाऊ

मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीचे वय 13 वर्ष आहे, तर भाऊ फक्त तीन वर्षांचा आहे. हे दोन्ही भाऊ-बहीण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांचे कुटुंब सातत्याने त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी (31 मे) प्रथम बहिणीचा मृतदेह सिंदूर नदीतून बाहेर काढण्यात आला, ज्यामुळे कुटुंबीय आणि स्थानिक लोकांची चिंता कमालीची वाढली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सोमवारी (1 जून) भावाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे.

हे ही वाचा : दोन तरुण..,बकऱ्याची कुर्बानी अन् एन्काऊंटर; नेमकं काय घडलं?

खेळणी विकून उदरनिर्वाह

मृतांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील फैजाबाद परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. हे कुटुंब हजारीबागच्या कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कूद गावात राहून आपले जीवन जगत होते. अत्यंत गरिबीत राहणारे हे कुटुंबीय रस्त्यांवर आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करत होते. या घटनेमुळे खेळणी विक्रेत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा : जालना हादरलं! विम्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये कोणाचा दिला बळी?

पोलिसांच्या हाती काय सुगावा लागला?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. दोन्ही मुलांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत आणि कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी करत दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी विविध बाजू लक्षात घेऊन सखोल तपास सुरू केला असला, तरी उशिरा सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती कोणताही मोठा सुगावा लागला नव्हता. मृतदेहांचे पोस्ट मार्टम करण्यात  येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.