Crime News : एका शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या सहा वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर बालक हे युकेजी (UKG) वर्गात शिकत होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून शाळेच्या वसतिगृहातच राहत होते. 7 जून रोजी या बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हत्येमागील कारण उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
अनैतिक संबंधांमधून विद्यार्थ्याची हत्या
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हत्या अनैतिक संबंधांमधून झाली आहे. वसतिगृह चालकाची पत्नी अंजली कुमारी आणि अंकित कुमार यांच्यात अनैतिक संबंध होते. 6 जूनच्या रात्री या बालकाने त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि तो घाबरून ओरडू लागला. आपली बदनामी होईल या भीतीने अंजली कुमारी हिच्या सांगण्यावरून आरोपी अंकित कुमारने मुलाचे तोंड आणि नाक जोरात दाबले, ज्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर मार्गांचा अवलंब केला आणि ही हत्या आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : Personal Finance: 'हे' कागद नसतील तर अजिबात खरेदी करू नका तशी शेतजमीन!
मृतदेह लटकवून आत्महत्या असल्याचे भासवले
गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी आधी मुलाचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी मुलाचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने लटकवून ती आत्महत्या असल्याचे भासवले. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी दोन अनोळखी व्यक्तींनी शाळेत येऊन मुलावर हल्ला केल्याचा दावा केला होता, ज्यामुळे तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे तपास केल्यानंतर संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. मुलाच्या आईने मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला होता, जो पोलिसांच्या तपासानंतर खरा ठरला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अंकित कुमार आणि वसतिगृह चालक सुनील कुमार यांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाचा बळी घेणाऱ्या या नराधमांच्या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या आणि पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी मृताचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. ही धक्कादायक घटना बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातून समोर आली आहे. मुरलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय.
ADVERTISEMENT











