Sangli Crime News, स्वाती चिखलीकर : सांगली शहरातील कुपवाड परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात पती-पत्नीचा दुहेरी खून झाल्याने सांगली हादरली आहे. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी शेजाऱ्याने दाम्पत्यावर चाकू आणि हातोड्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात चाकूने वार झालेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या घटनेमुळे दोन निष्पाप मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांना बदलता येणार, सुधारित प्रशासकीय नियम लागू
दाम्पत्याच्या मृत्यूमुळे दोन लहान मुली पोरक्या
या दुहेरी खुनाच्या घटनेनंतर संतप्त पडसाद उमटत आहेत. कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. दाम्पत्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. संशयित आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा : 44 वर्षीय हसीनाचे 23 वर्षीय तरुणासोबत अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या 40 वर्षीय पार्टनरची हत्या
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
मृत दाम्पत्याच्या मुलीनेही आपली व्यथा मांडत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. फरीद अब्दुल शेख हा कुपवाडमध्ये नवीन घर बांधल्यानंतर आपल्या कुटुंबाला त्रास देत असल्याचे मृत दाम्पत्याच्या मुलीने सांगितले. आम्ही या भागात राहायला आल्यापासून आरोपी त्रास देत होता. हा एरिया माझा आहे, तुम्ही इथून निघून जा, असे तो आमच्या कुटुंबाला सतत म्हणत होता, असा आरोप तिने केला आहे. या घटनेनंतर आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या फरीद अब्दुल शेख याला अटक केली आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तो मेडिकल कस्टडीत आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यात येत असून, लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. आरोपीला कडक शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पती-पत्नीच्या दुहेरी हत्येने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
ADVERTISEMENT












