शिवसेना अखंड राहावी म्हणून प्रति दादा कोंडके शिंदेंची सोलापूर ते मुंबई ‘पायी वारी’

मुंबई तक

• 07:47 AM • 21 Jul 2022

शिवसेनेच्या अखंडतेसाठी सोलापुरातील उळे येथून प्रती दादा कोंडके उत्तम शिंदेनी सोलापूर ते मुंबई पायी वारी सुरू केली आहे. दादा कोंडके यांच्या वेशभूषेत उत्तम शिंदे मुंबईला पायी निघाले आहेत. त्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रती दादा कोंडके म्हणून देखील ओळखतात. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना अखंड राहिली पाहिजे, या ध्येयाने सोलापूर ते मुंबई पायी वारी करण्याचा संकल्प […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेच्या अखंडतेसाठी सोलापुरातील उळे येथून प्रती दादा कोंडके उत्तम शिंदेनी सोलापूर ते मुंबई पायी वारी सुरू केली आहे. दादा कोंडके यांच्या वेशभूषेत उत्तम शिंदे मुंबईला पायी निघाले आहेत. त्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रती दादा कोंडके म्हणून देखील ओळखतात. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना अखंड राहिली पाहिजे, या ध्येयाने सोलापूर ते मुंबई पायी वारी करण्याचा संकल्प उळे (ता.दक्षिण सोलापूर) येथील प्रती दादा कोंडके उत्तम शिंदे यांनी केला आहे. या पायी वारीला गुरुवारी सकाळी नऊ वाजता सोलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन उत्तम शिंदे यांनी पायी वारी सुरू केली आहे. उत्तम शिंदे यांची ही पायी वारी 25 दिवसांची असेल, असं शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.

हे वाचलं का?

प्रतिदादा कोंडके अशी ओळख असलेले उत्तम शिंदे यांनी काय ठरवलं?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून शिवसेनेत मोठी उलथपालथ सुरू आहे. अनेक आमदार मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांचा हात धरला आहे. खासदारांचा एक गट देखील एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्थिरता निर्माण झाली आहे. म्हणून अनेक शिवसैनिक नेमके जायचे कुठे या गोंधळात आहेत. अशात शिवसेना पक्ष अबाधित आणि अखंडित राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. अशेच एक जुने शिवसैनिक आणि दादा कोंडके यांचे चाहते उत्तम शिंदे यांनी शिवसेनेसाठी पायी वारी सुरू केली आहे.

दादा कोंडके यांनी एकेकाळी शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम केले आहे. बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. त्याच मार्गावर उत्तम शिंदे हे आहेत. उत्तम शिंदे हे दादा कोंडके यांच्यासारखी वेशभूषा आणि सोंग घेत शिवसेनेचा प्रचार करतात. राज्यात विविध निवडणुकांमध्ये हे काम गेल्या 20 वर्षापासून शिंदे करतात. शिवसेना अखंड असावी, ही उदात्त भावना उराशी घेऊन पायी वारी करत असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले.

ऊन, वारा, पाऊस काहीही आले तरी ही वारी सुरू राहील, असे उत्तम शिंदे म्हणाले. मग कितीही दिवस लागले तरी चालेल. जशी देहू ते पंढरपूर अशी वारी असते, तशी माझ्या विठ्ठलापर्यंत सोलापूर ते शिवतीर्थ अशी पायी वारी करणार असल्याचं शिंदे म्हणाले. दररोज आपण २० ते २५ किमी पायी चालणार आहोत, मग त्याप्रमाणे २५ ते ३० दिवस लागू शकतात, असं उत्तम शिंदे यांचं म्हणणं आहे. सोलापूर ते मुंबई या पायी वारीत “एकला चलो रे” चा नारा घेऊन निघालेल्या या शिवसैनिकास गावोगावच्या शिवसैनिकांचे कसे पाठबळ मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp