abdul sattar son abdul sameer nomination rejected : छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी कृषी उत्पन्न संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज छानणीदरम्यान त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अब्दुल समीर यांना आता या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : समजून घ्या: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडीत नेहरूंचा रेकॉर्ड खरंच मोडला?
अब्दुल सत्तार यांना तगडा झटका
विशेष म्हणजे संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल समीर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत काही आश्वासने दिल्याचा दावाही केला होता. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच बाद झाल्याने सत्तार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा : Personal Finance: महाराष्ट्रातील टॉप 10 जागा.. 'इथे' फ्लॅट खरेदी केल्यानंतर मिळेल जबरदस्त पैसा!
कुणा-कुणाचा अर्ज झाला बाद?
या निवडणुकीत केवळ अब्दुल समीर यांचाच अर्ज बाद झालेला नाही. भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचा तसेच शिवसेनेच्या आमदार रंजना जाधव यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. याशिवाय दिवंगत माजी खासदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी इंदुमती पाटील, शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने, नामदेव पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तसेच विधान परिषद उमेदवार सुहास शिरसाट यांच्यासह अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विविध गटांतून दाखल करण्यात आलेल्या या अर्जांवर छानणी प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेण्यात आले होते. अनेक उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती नोंदवल्याने छानणी प्रक्रिया अधिक चर्चेत राहिली.
जिल्हा बँक प्रशासनाने संबंधित अर्ज नेमक्या कोणत्या कारणामुळे बाद केले याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र उमेदवारी अर्ज अवैध ठरण्याची काही सर्वसाधारण कारणे आहेत. उमेदवार किंवा मतदार हा संबंधित सहकारी संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी नसणे, सभासदत्व वैध नसणे किंवा कालबाह्य असणे, संस्थेच्या नोंदींमध्ये त्रुटी असणे, आवश्यक कागदपत्रे अपुरी असणे, प्रतिनिधित्वासंदर्भात वाद असणे किंवा निवडणूक नियमांचे पालन न करणे अशा कारणांमुळे अर्ज बाद होऊ शकतो. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांवर किंवा त्यांच्या कागदपत्रांवर आक्षेप घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून छानणी केली जाते आणि नियमांनुसार निर्णय घेतला जातो.
दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनेचे आमदार विलास भुमरे मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांच्या उमेदवारीविरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. दुसरीकडे अनेक प्रमुख नेत्यांचे अर्ज बाद झाल्याने जिल्हा बँक निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. अब्दुल सत्तार गटाच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुढे कोणती भूमिका घेतली जाते आणि राजकीय पक्षांमध्ये कोणती नवीन समीकरणे तयार होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











