Amit Thackeray exclusive interview : मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंग, त्यांच्या भाषणानंतर निर्माण झालेली चर्चा आणि राजकारणातील आपल्या भूमिकेबाबत स्पष्टपणे मत व्यक्त केले. भाषणादरम्यान काही क्षण ब्लँक झाल्यामुळे झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना त्यांनी त्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे सांगितले. दोन मिनिटांच्या त्या प्रसंगामुळे जर महाराष्ट्राचे किंवा लोकांचे काही नुकसान झाले असेल तर लोकांनी मला जरूर सांगावे, असे ते म्हणाले. माणसाकडून चुका होतात आणि त्या स्वीकारण्याची ताकद असणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी स्वतःच्या चुकांपासून पळ काढणार नसल्याचे स्पष्ट केले. लोकांनी स्वीकारले किंवा नाकारले तरी आपण त्यांच्यासाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, तरीही 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
राज ठाकरे यांचा पुत्र नसतो तर राजकारणात आलोच नसतो - अमित ठाकरे
अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. आपण राज ठाकरे यांचा पुत्र नसतो तर राजकारणात आलोच नसतो, हे छातीठोकपणे सांगण्यास आपल्याला कोणतीही भीती नसल्याचे त्यांनी म्हटले. यात काही चुकीचे नसून आपल्याला मिळालेला व्यासपीठ महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वडिलांनी महाराष्ट्रासाठी केलेले कार्य आपण लहानपणापासून पाहिले असून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकारणात आपली तुलना इतर कोणाशी नव्हे, तर फक्त राज ठाकरे यांच्याशी व्हावी, अशी आपली इच्छा असल्याचे सांगत त्यांच्या दहा टक्के जरी आपण गाठू शकलो तरी ते स्वतःसाठी मोठे यश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा विजय, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग
जनतेने निवडून दिलेले सरकार हटवण्याची ताकदही जनतेकडेच - ठाकरे
नीट पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनावरही अमित ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. या आंदोलनाचे कोणतेही श्रेय आपण घेत नसल्याचे सांगत हे सर्व अत्यंत नैसर्गिकरीत्या घडल्याचे त्यांनी म्हटले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांनी देशभरात लोक सरकारला प्रश्न विचारू लागल्याचे सांगितले. सरकारला प्रश्न विचारण्यासाठी लोकांकडे व्यासपीठ असले पाहिजे आणि लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले सरकार काम करत नसेल तर त्यांना हटवण्याची ताकदही जनतेकडेच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत मतदानाचा अधिकार हा जाती, धर्म किंवा भाषेच्या आधारावर नव्हे तर सरकारच्या कामगिरीच्या आधारे वापरला गेला पाहिजे, असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
भाषणानंतर झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाच्या प्रतिक्रियांचाही उल्लेख केला. भाषणानंतर आजीचा फोन आल्याचे सांगत तिने कार्यक्रम चांगला झाल्याचे सांगितल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. वडिलांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या, मात्र त्या सार्वजनिकपणे सांगणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रोलिंग सुरू असल्याचे कुटुंबीयांकडून समजले, पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. आपले लक्ष ट्रोलिंगपेक्षा कामावर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्र अधिक चांगला करून पुढच्या पिढीकडे सोपवणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत लोकांच्या चेहऱ्यावरचे हरवलेले समाधान आणि हसू परत आणण्यासाठी आपण काम करत राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी या Exclusive मुलाखतीत स्पष्ट केले.
ADVERTISEMENT











