शरद पवारांच्या एका फोनने बाळासाहेबांनी गेमच फिरवलेला... मनोहर जोशी CM बनण्याची Inside Story

मुंबई तक

23 Feb 2024 (अपडेटेड: 23 Feb 2024, 03:56 PM)

Manohar Joshi and Sharad Pawar: मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री कसे बनलेले याची एक अत्यंत रंजक कथा आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री बनण्यामागे शरद पवार यांचा मोठा हात होता असं नेहमी म्हटलं जातं. जाणून घ्या त्याचविषयी...

शरद पवारांच्या फोनने मनोहर जोशी बनलेले मुख्यमंत्री?

शरद पवारांच्या फोनने मनोहर जोशी बनलेले मुख्यमंत्री?

follow google news

Manohar Joshi CM Post and Sharad Pawar: मुंबई: शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री.. अशी ओळख असलेल्या मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं आज (23 फेब्रुवारी) निधन झालं. शिवसेनेसारख्या अत्यंत आक्रमक पक्षातील संयमी पण तितकंच कडवट नेतृत्व म्हणजे मनोहर जोशी.. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अत्यंत मर्जीतील.. पण याच मनोहर जोशींना मुख्यमंत्री पद कसं मिळालं याची एक अत्यंत रंजक कहाणीही आहे. तीच आपण जाणून घेऊया.. (balasaheb thackeray changed game after one phone call of sharad pawar interesting story of manohar joshi becoming cm)

हे वाचलं का?

महाराष्ट्रात 1995 विधानसभा निवडणुकीआधी कधीही शिवसेनेला सत्ता मिळाली नव्हती. मात्र, बाबरी मशिद घटनेनंतर शिवसेनेची जी हिंदुत्ववादी म्हणून इमेज तयार झालेली त्याचाच फायदा त्यांना 1995 सालच्या निवडणुकीतही झाला. कारण यावेळी महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला सत्ता सोपवली होती. 

त्यावेळी बाळासाहेबांचा करिष्मा हा मोठा होता.. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा होती. पण आपण कधीही सत्तेचं कोणतंही पद घेणार नाही अशी शपथच बाळासाहेबांनी घेतली होती. त्यामुळे ते जर मुख्यमंत्री नाही तर महाराष्ट्राचा शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

हे ही वाचा>> 'राजीनामा द्या', बाळासाहेबांचा आदेश अन् जोशींनी सोडलं होतं मुख्यमंत्रीपद

त्यावेळी शिवसेनेत अनेक ज्येष्ठ नेते होते. पण बाळासाहेब ठाकरे म्हणतील तोच मुख्यमंत्री होणार याची सगळ्यांनाच कल्पना होती.. खरं तर त्यावेळी अनेक नावं चर्चेत होती.. सुरुवातीला मनोहर जोशी हे नाव चर्चेत देखील नव्हतं. पण बाळासाहेबांनी  मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करण्याच्या आदल्या रात्री आलेल्या एका फोनने सगळ्या गेमच बदलला.. 

मनोहर जोशी CM बनण्याची Inside Story

खरं तर मनोहर जोशी यांच्याऐवजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे भाचे म्हणजेच सुधीर जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. चर्चा नव्हे तर जवळजवळ त्यांच्याच नावावर मुख्यमंत्री म्हणून मोहोर देखील उमटविण्यात आली होती. 

मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी सुधीर जोशी यांच्या नावालाच पहिली पसंती दिली होती. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमध्ये तशा स्वरूपाच्या बातम्याही छापून आल्या होत्या. त्यावेळी शिवसेना भवनाबाहेर तशी घोषणाबाजी देखील झाली होती. 

पण त्याच रात्री एका फोनने सगळा खेळच पालटला. सुधीर जोशी यांच्याऐवजी मनोहर जोशी यांच्या नावाची घोषणा झाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

त्यावेळी राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा होती की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका फोनने सुधीर जोशी यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली होती आणि त्यांच्याऐवजी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. 

त्याचं झालं असं की, अनेक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे वैयक्तिक पातळीवर अत्यंत सलोख्याचे संबंध होते. राजकीय पातळीवर कट्टर शत्रुत्व असलं तरी बाळासाहेब अनेकदा शरद पवारांच्या शब्दाला मानही द्यायचे. असं म्हणतात की, शरद पवारांनी त्यावेळी केलेल्या एका फोनने मुख्यमंत्रीपदाचं नाव हे बाळासाहेबांनी बदललं होतं. 

ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी आपल्या एका लेखात याबाबत असं म्हटलं आहे की, 'जाणत्या नेत्या'च्या मते, सुधीर जोशी हे अत्यंत स्वच्छ आणि सरळमार्गी होते.'

हे ही वाचा>> दसरा मेळाव्यातून मनोहर जोशींना जावं लागलं होतं निघून, नेमकी घटना काय?

मुख्यमंत्री म्हणून जो बेरकेपणा अंगी असावा लागतो त्याचा काहीसा अभाव हा सुधीर जोशींकडे होता. पण तोच बेरकेपणा सुधीर जोशींचे मामा असलेल्या मनोहर जोशींकडे नक्कीच होता. म्हणूनच ऐन वेळी सुधीर जोशींऐवजी मनोहर जोशी यांच्या गळ्यात बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पदाची माळ टाकली. 

दरम्यान, चार वर्षानंतर मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यांच्या जागी नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. तर सुधीर जोशी हे हळूहळू सक्रीय राजकारणातून बाहेर झाले. 

मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पद गमावलं तरी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा नेहमीच योग्य तो सन्मान केला. वाजपेयींचं सरकार सत्तेत असताना मनोहर जोशींना लोकसभेचं अध्यक्षपद देखील देऊ केलं होतं. 

मात्र, अखेरच्या काळात मनोहर जोशी हे शिवसेनेच्या राजकारणातून बाजूला सारले गेले. मात्र, त्याबाबत त्यांनी कधीही उघडपणे काहीही वाच्यता केली नाही. अखेर त्यांच्या निधनाने शिवसेनेने एक कट्टर शिवसैनिक मात्र गमावला!

    follow whatsapp