Balu Dhanorkar : …अन् त्या व्हायरल कॉलने काँग्रेसला महाराष्ट्रात दिला एकमेव खासदार

मुंबई तक

30 May 2023 (अपडेटेड: 30 May 2023, 07:46 AM)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. अशोक चव्हाण यांचा एक कॉल व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव धानोरकरच निवडून आले होते.

Balu Dhanorkar ashok chavan lok sabha election 2019 vrial coall

Balu Dhanorkar ashok chavan lok sabha election 2019 vrial coall

follow google news

Balu Dhanorkar News : बाळू धानोरकर अशोक चव्हाणांच्या व्हायरल झालेल्या एका फोन कॉल संभाषणामुळे खासदार झाले! खासदार धानोरकरांच्या अकाली निधनानंतर हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यामुळेच आपण चार वर्षांपूर्वी म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी नेमकं काय घडलं होतं? ऑडिओ क्लिपमध्ये चव्हाणांनी काय म्हटलं आणि काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणी तिकिटांमध्ये कसा फेरबदल झाला, यावर टाकलेला हा प्रकाशझोत

हे वाचलं का?

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं मंगळवारी 30 मे रोजी अकाली निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. किडनीशी संबंधित आजारामुळे धानोरकर यांना नागपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्येत आणखी बिघडल्यामुळे धानोरकरांना एअर अम्ब्यूलन्सने दिल्ली हलवण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालावली.

शिवसेना ते काँग्रेस… धानोरकर कसे बनले खासदार?

बाळू धानोरकर हे एकवेळा आमदार आणि एकवेळा खासदार राहिलेत. एक शिवसैनिक ते काँग्रेस खासदार असा धानोरकरांचा प्रवास राहिलाय. 2014 मध्ये ते वरोरा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले.

काँग्रेसमधून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कन्फर्म झाल्यामुळेच धानोरकरांनी शिवसेनेला रामराम ठोकला. पण ऐनवेळी धानोरकरांऐवजी तिकीट माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना मिळालं. यानंतरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू घडल्या.

अशोक चव्हाणांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय होतं?

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी बाळू धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणलं. पण तिकीट देता न आल्यानं चव्हाण चांगलेच तोंडघशी पडले. त्यामुळे नाराज झालेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने थेट चव्हाणांना कॉल केला. या कॉलनंतरच काँग्रेसमध्ये इतिहास घडला आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा सुफडा साफ होता होता राहिला. या कॉलमध्ये नेमका काय संवाद झाला होता?

हेही वाचा >> 2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?

राजूरकर म्हणतात, “सर, चंद्रपूर येथून विनायक बांगडे यांना तिकीट जाहीर झालं आहे. चंद्रपूरमधून आपला उमेदवार खात्रीशीर आहे ना?”

यावर अशोक चव्हाण म्हणाले होते की, “तुम्ही जे म्हणताय ते तिकडे मुकूल वासनिकांशी बोलून घ्या. माझं पूर्ण समर्थन आहे, पण काही लोकांना समजत नाही. मी तुमच्याबरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये.”

राजूरकर : “मुकूल वासनिक काहीच नाही ना सर तुमच्यापुढे, तुम्ही सगळा महाराष्ट्र सांभाळता.”

चव्हाण: “माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे. तुम्ही जरा वासनिकांशी बोला, आमची बाजू मांडा.”

हेही वाचा >> Balu Dhanorkar : काँग्रेसवर आघात! खासदार धानोकर यांचं दिल्लीत निधन

अशोक चव्हाणांच्या या कॉलवरील व्हायरल झालेल्या संभाषणाने काँग्रेसची दिल्लीपासून गल्लीपर्यंतची यंत्रणा हलली. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षाचाच शब्द चालत नाही, असा मेसेज गेला. त्यामुळे सगळीकडून दबाव आल्यानंतर काँग्रेसनं चंद्रपूरमध्ये आपला उमेदवार बदलला. आणि महाराष्ट्रात हाच एकमेव उमेदवार जिंकला. तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा तब्बल 44 हजार मतांनी पराभव झाला. फोन कॉल समोर आला नसता, तर महाराष्ट्रात काँग्रेस शून्यावर क्लीनबोल्ड झाली असती.

    follow whatsapp