Jay Pawar role in Campaigning : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) मतदान पार पडत आहे. अजित पवार यांच्या मृत्यूपश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार या पोटनिवडणूकीसाठी रिंगणात आहेत. या निवडणुकींसाठी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त सक्रिय राहिले ते त्यांचे पुत्र जय पवार. या प्रचारादरम्यान जय पवार यांच्यात अजित पवार यांच्या कामाची शैली दिसून आल्याची चर्चा रंगली होती. सुनेत्रा पवार यांच्यासाठी जय पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला.
ADVERTISEMENT
'बारामती आमचाही श्वास'
अजित पवार यांच्या समोर जय पवार यांनी एकदाच भाषण केले होते. त्या भाषणाचे अजित पवार यांनी कौतुक केले होते. असं असलं तरी या पोटनिवडणूकीत जय पवार यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बारामतीतील गाव-खेड्यांना भेटी देऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक ठिकाणी केलेल्या त्यांच्या भाषणाचं कौतुकही झालं. काही सभांमध्ये बोलताना ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. 'बारामती जसा दादांचा श्वास होता, तसा तो आमचाही श्वास आहे' असे उद्गार त्यांनी एका सभेत काढले होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. या प्रसंगानंतर सबंध प्रचारादरम्यान जय पवार यांचीच चर्चा बारामतीत सुरु असल्याचं पहायला मिळालं.
हे ही वाचा : "2029 मध्ये बारामतीतून मी निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा आहे..पण" ; जय पवार यांचं मोठं वक्तव्य
हार-तुरे स्वीकारले नाहीत
या प्रचारादरम्यान जय पवार यांनी कसलेल्या राजकारण्यासारखा प्रचार केला. हार-तुरे स्वीकारले नाहीत. त्यांनी मतदारसंघातील तरुणांशी संवाद तर साधलाच, मात्र ज्येष्ठ नेत्यांच्याही भेटी त्यांनी घेतल्या. कधी चहाच्या टपरीवर बसून लोकांशी संवाद साधला, तर कधी कार्यकर्त्यांच्या गाडीवर बसून मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी ते एका गुलाबी रंगाच्या बाईकवर बसलेले दिसले. तेव्हा 'पाडू नको बरं!' असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या मिश्किल स्वभावाचीही चर्चा झाली. अशा प्रकारे जय पवार यांनी आपल्या आईच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळल्याचं पहायला मिळालं. एवढ्यावरच जय पवार थांबलेले नाहीत, तर आज (23 एप्रिल) देखील मतदान केंद्रांवर भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
हे ही वाचा : मतदानानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, दादांच्या आठवणीने कंठ दाटला; नेमकं काय म्हणाल्या?
अपक्ष उमेदवारांकडून पैशांची मागणी नाही
आज मतदान केल्यानंतर जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या लोकांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यापैकी 20 ते 23 लोकांनी अर्ज मागे घेतले. आमच्याकडे अपक्ष उमेदवारांनी पैशाची मागणी केलेली नाही. त्यांच्या इतर मागण्या होत्या. मात्र, त्यातल्या त्यात कधीकधी कोणाला आर्थिक मदत लागत असते.'
पार्थ पवार प्रचारापासून दूर
दरम्यान, बारामती मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली होती. यावेळी पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी केलेल्या विधानामुळे ते वादात सापडले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील प्रचारापासून लांबच राहिल्याचे पहायला मिळाले.
ADVERTISEMENT











