Crime News : बिहारमधील रोहतास जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ‘तुमची मुलगी पळून गेली आहे’ असा फोन जावयाने रात्री उशिरा सासरच्या मंडळींना केला. मुलगी कुठेतरी गेली असून लवकरच घरी परत येईल, या आशेवर कुटुंबीय वाट पाहत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी समोर आलेल्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. युवतीचा मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये भरून भाजी मंडईत फेकून देण्यात आल्याचे उघड झाले.
ADVERTISEMENT
ही घटना रोहतास जिल्ह्यातील डेहरी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भाजी मंडीजवळ घडली. रविवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास एक संशयास्पद अवस्थेतील ट्रॉली बॅग पडलेली दिसली. बॅगमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना अनिष्ट घडल्याची शंका आली आणि त्यांनी तातडीने डेहरी नगर पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनास्थळी मोठी गर्दी
सूटकेसमध्ये मृतदेह असल्याची बातमी काही वेळातच परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच डेहरी नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रॉली बॅग उघडून पाहिली असता त्यात एका युवतीचा मृतदेह आढळून आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला.
पोलिसांकडून तपासाला सुरुवात, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
पोलिसांनी त्वरित कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला आणि सासाराम येथील सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत महिलेची ओळख पटवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यात आली असून कोणतेही पुरावे नष्ट होऊ नयेत याची काळजी घेण्यात येत आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) पथकानेही घटनास्थळी भेट देत आवश्यक नमुने गोळा केले आहेत. या प्रकरणाबाबत रोहतासचे पोलीस अधीक्षक रौशन कुमार यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमार्टम अहवाल आणि एफएसएलच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून ट्रॉली बॅग नेमकी केव्हा आणि कोणी घटनास्थळी आणून ठेवली, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा : एकत्र आयुष्य संपवण्याचं प्रेयसीला आश्वासन... विवाहित प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला काटा! नेमकं काय घडलं?
मृतदेहाची ओळख पटली; नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर
घटनेनंतर सुमारे सहा तासांनी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत महिलेची ओळख मरीन खातून (25 वर्षे) अशी झाली असून, ती चंदौली जिल्ह्यातील सकलडीहा स्थानकाजवळील बटघी गावाची रहिवासी होती. तिचा विवाह 2022 मध्ये डेहरी येथील जक्की बीघा परिसरातील रहिवासी मोहम्मद कयामुद्दीन याच्याशी झाला होता. ओळख पटताच नातेवाइकांना माहिती देण्यात आली आणि त्यांच्या उपस्थितीत सासाराम येथील सदर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पती व सासरच्या इतर सदस्यांवर हत्येचा आरोप
मृत महिलेच्या नातेवाइकांनी पती मोहम्मद कयामुद्दीनसह सासरच्या इतर सदस्यांवर गंभीर हत्येचा आरोप केला आहे. नातेवाइकांचे म्हणणे आहे की, कयामुद्दीनचे त्याच्या मामाच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते, यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. नातेवाइकांनी सांगितले की, मागील रात्री कयामुद्दीनने फोन करून मरीन खातून घरातून पळून गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर नातेवाईक तिच्या माहेरी तिची वाट पाहत होते; मात्र रविवारी सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची बातमी येताच सर्वांनाच धक्का बसला.
कौटुंबिक पार्श्वभूमीही संशयास्पद
नातेवाइकांनी हेही सांगितले की, यापूर्वी कयामुद्दीनच्या आईची तिच्या दिराकडून निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहासही संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. सध्या पोलीस सर्व बाबींवर गांभीर्याने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या खळबळजनक हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड : पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; साडेतीन वर्षांच्या मुलासह आईची विहिरीत उडी, दोघांचाही करुण अंत
ADVERTISEMENT











