Dharashiv Politics, गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. अचानक उफाळलेल्या या राड्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच घडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT
कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गट आमनेसामने आले आणि बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणांतच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार उफाळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : अॅडिशनल प्रोफेसरने MD निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तात्काळ निलंबनाचे आदेश...
जिल्हा परिषद निवडणुकीत मस्के कुटुंबातील वर्षा मस्के या डिकसळ जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शीतल वनकळस या उमेदवार होत्या. प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी पांडुरंग कुंभार यांनी वर्षा मस्के यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.
दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या पूजा तुषार शिंदे विजयी झाल्या. प्रचाराच्या काळात झालेल्या राजकीय भूमिका आणि परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच तणाव होता. याच पार्श्वभूमीवर वर्षा मस्के यांचे दीर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद वाढला. हा वाद पाहता पाहता दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये तुफान राड्यात परिवर्तित झाला. चौकात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधितांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे कळंब शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या लेकाची तब्बेत बिघडली, तेजस ठाकरेंवर 3 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु
ADVERTISEMENT











