‘हा भाजपचा पिढीजात धंदा’; शिवसेनेनं (UBT) डिवचलं, फडणवीसांवर टीकेचे बाण

मुंबई तक

17 May 2023 (अपडेटेड: 17 May 2023, 03:21 AM)

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये दंगली आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपवर टीका केली आहे.

Uddhav thackeray faction attacks on Devendra fadnavis and bjp over riots incidents in maharashtra

Uddhav thackeray faction attacks on Devendra fadnavis and bjp over riots incidents in maharashtra

follow google news

“ज्यांची सत्ता दंगलीच्या ज्वालेतून निर्माण झाली त्यांना दंगलीचे व धार्मिक तणावांचे प्रेम असणारच”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यात घडलेल्या दंगली आणि हिंसाचाराच्या घटनेवरून थेट भाजपवरच ठपका ठेवला आहे. भाजपत ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळ’ असल्याचं सांगत ठाकरे गटाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेने सामना अग्रलेखातून राज्यात झालेल्या हिंसाचार आणि दंगलीच्या घटनांवर भाष्य केलं आहे. राज्यातील सत्तांतरांनंतर या घटना वाढल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

अग्रलेखात म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते.”

‘महाराष्ट्र धुमसत राहण्यासाठी नियोजन…’

“विदर्भातील अकोला येथे शनिवारी दोन गटांत दंगलीचा भडका उडाला. किरकोळ वादातून हाणामारी व त्यातून दंगलीची आग भडकली. ही दंगल हाताळण्यात पोलीस कमी पडले. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. अकोला येथे सध्या 144 कलम लागू करण्यात आले आहे. तथापि संपूर्ण शहरात या हिंसाचारामुळे भीतीचे सावट आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवरून अकोल्यात एक दंगल उसळली व अकोला शहर दोन दिवस धुमसत राहिले. हे धुमसणे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रकृतीला मानवणारे नाही, पण महाराष्ट्र धुमसत राहावा याचे योजनाबद्ध नियोजन पडद्यामागून सुरू आहे”, असं गंभीर भाष्य ठाकरे गटाने केलं आहे.

भाजपत ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळ’

“अकोल्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातील शेवगाव येथेही हिंसाचार झाला. रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली व प्रकरण नियंत्रणाबाहेर गेले. शेवगावच्या दंगलीत पोलीस जखमी झाले. शेवगावात हे सर्व घडत असताना नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वर मंदिरात अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही मुस्लिम मंडळींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून चादर चढवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षातील ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळा’ने यावर लगेच आपापले भोंगे वाजवून राजकीय ‘जनजागृती’चे कार्य हाती घेतले. प्रश्न धार्मिक भावनांचा आहे. अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधानांपासून बरेच भाजप नेते श्रद्धेची चादर चढवीत असतात, पण ती त्यांची प्रतीके आहेत. हिंदू देवतांवर चादर चढविण्याच्या पद्धती नाहीत”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा >> Rahul Narvekar: …तर भरत गोगावले पुन्हा प्रतोद होणार?, राहुल नार्वेकरांनी केलं मोठं विधान

ठाकरे गटाने पुढे म्हटलं आहे की, “गणेशोत्सवात अनेक मुसलमान बांधव श्रद्धेने येत असतात. मुस्लिम मोहल्ल्यांतून विसर्जनासाठी जाणाऱ्या लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा वगैरे मिरवणुकांवर पुष्पवृष्टी, पूजाअर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा जंगी सोहळा पार पडला. भर उन्हात लाखो श्री सेवक जमले. त्यांना पाण्याच्या बाटल्या, सरबत, खायचे पदार्थ देण्याचे काम मुस्लिम संघटनांचे युवक करीत होते. महाराष्ट्रात हा असा सलोखा चांगल्या पद्धतीने निर्माण झाला असताना कोणाला तरी या सद्भावनेला चूड लावायची इच्छा दिसत आहे.”

भाजप दंगली घडविणारा कारखाना

“कधी नव्हे ते यावेळी रामनवमीस मुंबईसह काही भागांत दंगली झाल्या. छत्रपती संभाजीनगरात हिंसाचाराचा भडका उडाला. हे कसले लक्षण मानायचे? राज्यात सध्या भडकविल्या जात असलेल्या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांचे चेहरे मी लवकरच बाहेर आणेन, असा इशारा गृहमंत्री फडणवीस यांनी दिला. पण त्यांचे बोलणे सध्या फोल ठरत आहे. भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेणारा व दंगली घडविणारा कारखाना आहे, मात्र हा कारखाना आता दिवाळखोरीत निघाला आहे”, अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

हेही वाचा >> त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश

अग्रलेखातून मोदी-शाहांनाही खडेबोल सुनावण्यात आले आहेत. “प. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान दंगली घडविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. कालच्या कर्नाटक निवडणुकीतही शेवटच्या क्षणी बजरंग बली, हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करून धार्मिक तणाव व दंगली घडविण्याची योजना आखली गेली, पण कानडी जनतेने ही योजना उधळून लावली व मोदी-शहाकृत भाजपचा दारुण पराभव केला. बिहारातही दंगली भडकविल्या गेल्या, पण फायदा झाला नाही. मणिपुरात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. तेथे अख्खे राज्य दंगलीत होरपळले व त्या धुराचे लोट दिल्लीपर्यंत पोहोचले. तो वणवादेखील मोदी-शहांना अद्याप विझवता आलेला नाही.”

हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं

“ज्यांची सत्ता दंगलीच्या ज्वालेतून निर्माण झाली त्यांना दंगलीचे व धार्मिक तणावांचे प्रेम असणारच, पण देशाची जनता आता अशा तणावास विटली आहे. महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा उघडून भाजप व त्यांचे पुरस्कर्ते सामाजिक सलोखा बिघडवून मतांचे ध्रुवीकरण करू पाहत आहेत. काही विषय सामंजस्याने, सलोख्याने सोडवले जाऊ शकतात; पण शिवसेना फोडून राज्य केले जात आहे, त्याप्रमाणे समाज फोडून त्यांना निवडणुका लढवायच्या असाव्यात. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत. राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावे”, असं भाष्य ठाकरे गटाने केलं आहे.

    follow whatsapp