Crude Oil in India : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची आवक बंद झाल्याने सबंध जग चिंतेत असलेले पहायला मिळत आहे. भारतावर देखील याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तेलाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मात्र भारतातील तेलावर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारताच्या जुन्या मित्राने कच्च्या तेलाची एक शिपमेंट पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. एका रिपोर्टनुसार, लवकरच ही शिपमेंट भारताकडे रवाना होणार आहे. भारताला मदत करणारा हा जुना मित्र म्हणजे रशिया. भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताच्या संकटकाळात सदैव भारतासोबत राहणाऱ्या रशियाने पुन्हा एकदा भारताला मदतीसाठी हात पुढे केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धर्म बदलायचा असेल तर 60 दिवस आधी...', महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; अधिवेशनात विधेयक मांडणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची आवक बंद
मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यामुळे जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या 'होर्मुझ सामुद्रधुनीतून' (Strait of Hormuz) कच्च्या तेलाची आवक बंद झाली आहे. अशा परिस्थितीत, रशिया कच्च्या तेलाची खेप भारताकडे पाठवण्यासाठी सज्ज झाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सध्या भारतीय जलक्षेत्राजवळ जहाजांवर सुमारे 95 लाख बॅरल रशियन कच्चे तेल उपलब्ध असून, ते काही आठवड्यांतच भारतात पोहोचवले जाऊ शकते. भारतासाठी हा मोठा दिलासा आहे. पुरवठ्यात अडथळे वाढले असताना भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यांसाठी (रिफाइनर्स) ही मोठी मदतीची बातमी आहे.
भारताकडे 'इतके' तेल शिल्लक
जहाजांवरील हा माल नेमका कुठे जात होता, हे सूत्रांनी स्पष्ट केले नसले तरी, बिगर रशियन ताफ्यातील जहाजांद्वारे वाहून नेला जाणारा हा माल गरज पडल्यास तातडीने भारताकडे वळवला जाऊ शकतो, असे नमूद केले आहे. भारताकडे सध्या मर्यादित तेलसाठा असल्याने भारत तेलपुरवठा सुरू राहील अशा पर्यायाच्या शोधात आहे. अहवालानुसार, भारताकडे असलेला कच्च्या तेलाचा साठा साधारण 25 दिवसांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे, तर डिझेल, पेट्रोल आणि पेट्रोलियम गॅस यांसारख्या रिफाईन उत्पादनांचा साठा देखील कमी आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, एका भारतीय सरकारी सूत्राने सांगितले की, भारत सरकारने पर्यायी पुरवठा पर्यायांचा शोध सुरू केला आहे, कारण मध्यपूर्वेतील संघर्ष पुढील 10-15 दिवस सुरू राहू शकतो, ज्यामुळे शिपमेंटवर परिणाम होऊ शकतो. होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास अस्थिरता निर्माण झाल्यामुळे भारतासाठी कच्च्या तेलाचा धोका निर्माण झाला आहे.
भारताची गरज रशिया पूर्ण करणार
भारतातील रिफायनरी दररोज सुमारे 5.6 दशलक्ष बॅरल तेलाचे शुद्धीकरण करतात. याचा अर्थ असा आहे की, शिपिंग मार्गांमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा अडथळा आल्यास पुरवठ्यात वेगाने घट होऊ शकते. उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे की, जर मध्य-पूर्व देशांमधून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट झाली, तर मॉस्को ही दरी भरून काढण्यासाठी तयार आहे आणि भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या 40 टक्क्यांपर्यंत पुरवठा करण्याची क्षमता ठेवते. विशेष म्हणजे, भारताने रशियाकडून केलेली तेल आयात या वर्षाच्या सुरुवातीला कमी झाली होती.
हे ही वाचा : जालना : गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू,..दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
रशियाकडून सध्या किती आयात होते?
जानेवारीमध्ये ही आयात घटून दररोज सुमारे 1.1 दशलक्ष बॅरलवर आली होती, जी नोव्हेंबर 2022 नंतरची सर्वात नीचांकी पातळी होती. अमेरिकेसोबतचे व्यापारी तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे हे घडले होते. उद्योगाच्या आकडेवारीनुसार, भारताच्या कच्च्या तेल आयातीत रशियाचा वाटा घसरून 21.2 टक्क्यांवर आला होता, मात्र फेब्रुवारीमध्ये तो पुन्हा वाढून सुमारे 30 टक्के झाला आहे.
ADVERTISEMENT











