आजचा मुद्दा: 'उद्धव ठाकरेंकडून टोलवाटोलवी सुरू आहे का?', युतीबाबत मनसेला वाटतोय संशय!

मनसे शिवसेना UBT च्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसेकडून मात्र असा दावा केला जात आहे की, युतीसाठी उद्धव ठाकरे केवळ टोलवाटोलवी केली जात आहे.

उद्धव ठाकरेंकडून टोलवाटोलवी सुरू आहे का?

उद्धव ठाकरेंकडून टोलवाटोलवी सुरू आहे का?

साहिल जोशी

• 11:30 PM • 06 Jun 2025

follow google news

मुंबई: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल.' असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत मोठे संकेत दिले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना UBT आणि मनसेच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात नव्याने जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, असं असताना मनसेकडून मात्र आता सावध पावलं टाकली जात आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टोलवाटोलवी चालली असा दावाच मनसेकडून केला जात आहे. मुंबई Tak च्या आजचा मुद्दा या विशेष शोमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे विधान केलं. या कार्यक्रमात शिवसेना (UBT) नेते दिपेश म्हात्रे यांनीही सहभागी होऊन पक्षाची बाजू यावेळी मांडली. 

हे वाचलं का?

मनसेला शिवसेना UBT बद्दल का वाटतोय संशय?

कार्यक्रमात बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, 'जर 2017 सारखा अनुभव पुन्हा आला तर याची गॅरंटी कोण घेणार?'  

ज्यावर उत्तर देताना दिपेश म्हात्रे म्हणाले की, 'आम्हाला भाजपकडून वाईट अनुभव आलेच.. पण तेवढेच शिवसेनेकडून देखील वाईट अनुभव आले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील. म्हणजे ज्या पद्धतीने खोट्या केसेस अडीच वर्षात माझ्यावर टाकल्या गेल्या. मी तेही विसरायला तयार आहे. जर दोन भाऊ एकत्र यायला तयार असतील तर..' 

ज्यावर उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, 'पण जर तुम्ही म्हणता की, गॅरंटी कोणतीच नाही. तर चर्चा होऊच कशी शकते. तुमचं माझं सोडून द्या.. पण दोन भावांना तर कॉन्फिडन्स बिल्डिंग करावं लागेल ना. त्याशिवाय युती होणार नाही.'

हे ही वाचा>> ShivSena UBT-MNS: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल', उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!

'2014 ला शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा भाजपकडून आम्हाला युती करायची ऑफर होती. पण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला की, आपण एकत्र येऊया. म्हणून आम्ही थांबलो.. आम्ही भाजपसोबत गेलो नाही. त्यानंतर आम्ही एबी फॉर्म देखील द्यायचे थांबवले होते. त्यावेळी त्यांनी युती केली नाही आणि आम्हालाही करू दिली नाही.' 

'मी जे म्हणतो की, अनुभवाच्या शिदोरीवर.. आता विषय असा आहे की, तुम्हाला खरोखर युती करायची आहे का? तर त्यासाठी फक्त एक फोन कॉल पुरेसा आहे. पण तुम्हाला आम्हाला फक्त झुलवायचं आहे का? या संदर्भातील नेमका विश्वास वाढायला हवा.' 

'उद्धव ठाकरे आजही बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. म्हणजे इथेही त्यांनी कोडं घातलं. पण ते असं नाही म्हणाले की, मी युतीबाबत सकारात्मक आहे.'

हे ही वाचा>> 'मी आदर मागितला, मला अपमान मिळाला...', 20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी का सोडलेली शिवसेना?

'आज कार्यकर्त्यांना कितीही वाटलं की, दोन्ही भावांनी एकत्र यावं तरी शेवट पक्षाचा व्यापक विचार हा राज साहेबांना करताना जे मागील अनुभव आहेत त्याचाही विचार करावा लागेल. म्हणून यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल.' 

'फक्त सकारात्मक आहोत असं म्हणत आहात. पण यामधून ठोस गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे संशयाला जागा निर्माण होत आहे. ही जाणूनबुजून टोलवाटोलवी चालली आहे का?'

'खरं तर हा सगळा विषय सुरु झाला ते राज साहेबांच्या एका मुलाखतीनंतर झाला. सुरुवात तिकडून झाली. पण आता त्या गोष्टीला देखील 2 महिने होऊन गेले. आता दोन महिने लागतात वांद्रेवरून दादरला यायला?' 

'मग ही फक्त टोलवाटोलवी चालली आहे का? जशी ती आधी चालत होती ती.. या गोष्टीमुळे संशय बळावतोय. त्यामुळे याबाबतीत ठोस उपाययोजना झाली नाही तर हा संशय वाढत जाण्याची शक्यता आहे.' असं म्हणत संदीप देशपांडे यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युती करण्याची हमीच मागितली आहे.

    follow whatsapp