Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!
19 जुलै मुंबईत कोसळणाऱ्या पावसादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. ज्यामध्ये एक सहा महिन्यांची छोटी मुलगी ही तिच्या आजोबांच्या हातातून निसटून थेट नाल्यात पडली. याच घटनेबाबत आता मुलीच्या आजोबांनी नेमकी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

भिवंडी: कल्याण-ठाकुर्ली (Kalyan-Thakurli)दरम्यान दोनच दिवसांपूर्वी एक सहा महिन्यांची चिमुकली ही तिच्या आजोबांच्या हातातून निसटून थेट वाहत्या पाण्यातील नाल्यात पडली होती. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर काही वेळातच चिमुकलीला एनडीआरएफने (NDRF) वाचवलं अशीही माहिती अचानक व्हायरल होऊ लागली. पण आता तब्बल 48 तास उलटून गेलेले असतानाही तो निष्पाप जीव अद्यापही सापडलेला नाही. आता ही नेमकी घटना कशी घडली याबाबत चिमुकल्या मुलीच्या आजोबांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. (shocking incident kalyan thakurli a six month old girl escaped from her grandfather hands and fell in drain now grandfather given exact information about incident)
‘त्या’ चिमुकलीच्या आजोबांनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं:
मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पोगुल हे आपल्या मुलीसोबत नातीला घेऊन वाडिया रुग्णालयात गेले होते. तिथून परतत असतानाच ही दुर्देवी घटना घडली. पाहा या घटनेबाबत ते नेमकं काय म्हणाले:
‘मी वाडिया रुग्णालयात गेलो होतो. मला कोपरला उतरायचं होतं. पण मी कोपरला उतरलो नाही.. कल्याण स्टेशन जवळ आहे म्हणून मी पुढे आलो. त्यानंतर मी डोंबिवलीच्या पुढे जी खाडी आहे तिकडे ट्रेन बराच वेळ थांबली म्हणून मध्येच उतरलो. इथेच आधी पाय घसरुन माझी मुलगी आधी पडली होती. त्यानंतर मी पण पडणार होतो. पण त्यावेळी माझ्या हातून माझी नात सटकली. गेल्या सहा महिन्यापासून माझ्या नातीवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’
‘गाड्या सगळ्या थांबल्या होत्या. तर आम्ही पण खाली उतरलो त्याच वेळी आमचा पाय घसरला.. पहिले माझ्या मुलीचा पाय घसरला म्हणून मी तिला उचलायला गेलो. तिला उचललं दोघा तिघांनी.. नंतर मी नातीला घेऊन चालायला लागलो.. तर माझा पाय घसरला.. त्याच वेळी माझी नात माझ्या हातातून सटकली..’
‘नेमकी परिस्थिती म्हणजे संपूर्ण लोकल खाली झाली होती. त्यामुळे आम्ही पण उतरलो होतो. तीन तास गाडी एकाच ठिकाणी थांबली होती. आम्ही बाराला निघालो होतो..’
‘प्रत्येक महिन्याला आम्ही जात होतो.. म्हणजे वाडिया रुग्णालयात दाखवायला.. वाडिया रुग्णालयातच उपचार सुरू होते. भिवंडीत उपचार झाले असते तर 100 टक्के ही घटना टळली असती.’
‘भिवंडीत ती सुविधा नाही. तिला ऑपरेशनसाठी चार-पाच लाख बोलले होते. तर आम्हाला डॉक्टरने सांगितलं की, वाडिया रुग्णालयात चांगले उपचार होतात. म्हणून सहा महिने तिकडे उपचार सुरू होते. बाळाचा शोध सुरू आहे. बाळ सापडलं तर आम्हाला कळवणार असल्याचं सांगितलं जाईल असं म्हणाले आहेत.’ असं म्हणत दुर्दैवी घटनेबाबत ज्ञानेश्वर पोगुल यांनी दु:ख व्यक्त केलं.
नेमकी घटना काय?
19 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम हा लोकल ट्रेनवर झाला होता. दरम्यान, कल्याणनजीक सिग्नल न मिळाल्याने थांबलेल्या लोकलमधून उतरून एक सहा महिन्याच्या बाळाला आई आणि आजोबा घेऊन पायी चालले असताना सहा महिन्याची चिमुकली ही नाल्यात पडली आणि थेट खाडीच्या प्रवाहातून वाहून गेली.
योगिता रुमाळे या मुंबईहून आपल्या वडिलांसह सहा महिन्याच्या ऋषिकाला घेऊन प्रवास करत होती. मात्र, मुसळधार पावसामुळे आधीच ठप्प असलेल्या लोकल सेवेला अनेक ठिकाणी ट्रॅकवरील पाणी आणि सिग्नल मिळत नसल्याने लोकल एकाच ठिकाणी बराच काळ उभ्या होत्या. त्यातच योगिता ज्या लोकलमधून प्रवास करत होती ती लोकल कल्याण-ठाकुर्ली दरम्यान आली असता सिग्नल न मिळाल्याने बराच वेळ थांबली होती. त्यामुळे योगिता आणि योगिताच्या वडिलांनी लोकलमधून उतरून पायी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.