Eknath Shinde : सावरकर जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांच्या दोन मोठ्या घोषणा
वांद्रे वरळी सी लिंक पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
ADVERTISEMENT

वीर सावरकर जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईत वांद्रे वर्सोवा समुद्र सेतूचं काम सुरू आहे. या समुद्र सेतूला सावरकरांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या देशाचं, या राज्याचं आणि या मातीचं सुदैव आहे की, सावरकरांसारखा जहाल देशभक्त जन्माला आला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूला 57 वर्षे झाली, तरी अनेकांना सावरकर कळले नाहीत. आंदमानच्या तुरूंगात ब्रिटिशांनी त्यांचा अतोनात छळ केला. काही लोक त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न करतात, तेही दुर्दैवी आहे. चीड आणणारे आहे.”
एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे
“आज देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाली आणि सावरकर आपल्यातून जाऊन 57 वर्ष लोटली तरीसुद्धा सावरकरांची दहशत आणि भीती अनेक लोकांच्या मनात आजही तशीच आहे. म्हणून ते वारंवार त्यांच्याबद्दल चुकीची माहिती, जाणीवपूर्वक काही वक्तव्ये करतात”, असं टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.
…म्हणून विरोधकांकडून खटाटोप -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सावरकर आणि त्यांचे हिंदुत्ववादी विचार जर लोकप्रिय झाले तर आपला बाजार कायमचा उठेल, अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून तो हा खटाटोप करताहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिभावंत साहित्यिक होते, कवी होते. भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी त्यांनी इंग्रजीला अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. ते आपण वापरतो.”