वडील आणि भावाचा मृत्यू, आता बहिणीलाही.. टीम इंडियाच्या आकाश दीपची कहाणी वाचून तुम्हीही ढसाढसा रडाल!
Akash Deep family: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 बळी घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण आकाशचा इथवरचा प्रवास अत्यंत संघर्षमय असा आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बद्दी या छोट्याशा गावातून टीम इंडियामध्ये आलेल्या वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंडमधील एजबॅस्टन मैदानावर इतिहास रचला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली, पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. म्हणजेच, संपूर्ण सामन्यात एकूण 10 बळी घेऊन त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आकाश दीप आता इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटीत 10 बळी घेणाऱ्या काही भारतीय गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. एवढेच नाही तर तो 1976 नंतर इंग्लंडच्या टॉप-5 फलंदाजांपैकी 4 फलंदाजांना पहिल्या डावात पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.
संघर्षांनी भरलेला होता आकाशदीपचा प्रवास
आकाश दीपचा प्रवास सोपा नव्हता. तो 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील नायक शहीद बाबू निशान सिंग यांचा वंशज आहे. निशान सिंग हे वीर कुंवर सिंग यांचे सेनापती होते. ब्रिटिशांनी त्यांना कैमूरमधील गुहेतून पकडून तोफेने उडवून दिले होते. त्याच मातीतून आलेला हा तरुण आज देशासाठी क्रिकेटमध्ये इतिहास घडवत आहे.
एका सामान्य कुटुंबातील मुलाची असाधारण कहाणी
आकाश एका सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील रामजी सिंग सासाराममध्ये शिक्षक होते आणि त्यांना त्यांच्या मुलाने सरकारी नोकरी करावी असे वाटत होते. पण आई लाडूमा देवी यांनी मुलाची क्रिकेटमधील आवड समजून त्याला प्रशिक्षणासाठी पाठवले. 2015 साली आकाश दीपवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुरुवातीला त्याचे वडील अर्धांगवायूने वारले आणि त्यानंतर दोन महिन्यांतच त्याचा मोठा भाऊ धीरज सिंग याचं मलेरियामध्ये निधन झालं. त्यामुळे घराची जबाबदारी आकाशवर आली. आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण तो हिंमत हरला नाही.
बहिणीला कर्करोग
एजबॅस्टन कसोटी जिंकल्यानंतर आकाश दीपने सांगितले की, त्याची मोठी बहीण ज्योती सिंग ही कर्करोगाशी झुंज देत आहे. त्याने सांगितले की त्याने ही कामगिरी त्याच्या बहिणीला समर्पित केली आहे. ज्योती सध्या लखनऊमध्ये राहते आणि अलीकडेच तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.
आकाश दीपचं धैर्य
सहा भावंडांपैकी सर्वात लहान असलेल्या आकाश दीपची कहाणी केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही. ही एका तरुणाची कहाणी आहे ज्याने अडचणींसमोर कधीही हार मानली नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक दुःखांमध्ये त्याने आपली स्वप्ने मरू दिली नाहीत. आज त्याच संघर्षाने त्याला भारतीय संघात स्थान मिळवून दिलं आणि त्याने त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं.
कोलकाता ते टीम इंडियाचा प्रवास
आकाश दीपने सासाराम ते दुर्गापूर आणि नंतर कोलकाता असा प्रवास केला. तिथे त्याला बंगालच्या अंडर-23 संघात संधी मिळाली आणि 2017-18 च्या हंगामात त्याने 42 विकेट्स घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली. 2022 मध्ये आरसीबीने त्याला आयपीएलमध्ये संधी दिली आणि तिथून इंडिया-A आणि नंतर टीम इंडियाचे दरवाजे उघडले.